ऑनलाईन टिम : मुंबई
महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून नविन युतीवर टीका केली. शिंदे गटातील काही आमदारांविरुद्ध अपात्रतेच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून अशा आमदारांना मंत्रिपद देणे ही “लोकशाही आणि संविधानाची हत्या” असल्याचे सामनाच्या संपादकियमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांविरुद्ध अपात्रतेच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार आहे. ही गोष्ट निदर्शनास आणून देत नवीन सरकारची ही कृती म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे दैनिक सामनामध्ये म्हटले आहे. भाजपा आणि शिंदेगटावर तोंडसुख घेताना शिवसेनेने राजभवनात मंत्र्यांना शपथ देणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर ही जोरदार टिका केली आहे.
“…राज्यपालांनी 40 दिवसांपूर्वी बेकायदेशीर सरकारचा शपथविधी घेतला आहे. अशा या बेकायदेशीर सरकारच्या मंत्र्यांना शपथ देऊन राज्यपालांनी संविधानाचा अवमान केला आहे” असेही संपादकीयात म्हटले आहे. ज्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, अशा काही आमदारांना शपथ देणे ही लोकशाहीची आणि संविधानाची हत्या आहे. पण अशा नराधमांना देशात मोकळे सोडले आहे आणि त्यांच्यामार्फत राज्याचे व्यवहार चालवले जात आहेत अशीही टिका शिवसेनेने संपादकियमधून भाजप आणि शिंदे गटावर केली आहे.