भारताची टीका, इंदिरा गांधी हत्येचे उदात्तीकरण करणाऱ्या कार्यक्रमाचा निषेध
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे उदात्तीकरण करण्यासाठी कॅनडातील शीख अतिरेक्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा भारताने तीव्र निषेध केला आहे. तसेच या कार्यव्र्रमाला अनुमती दिल्यामुळे कॅनडालाही इशारा दिला आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना अनुमती देणे, हे सौहार्दपूर्ण संबंधांसाठी प्रतिकूल आहे, असे प्रतिपादन भारताचे विदेश व्यवहार मंत्री जयशंकर यांनी केले. कॅनडाच्या ब्रॅप्टन या शहरात काही खलिस्तानवादी अतिरेक्यांनी एकत्र येऊन इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या प्रसंगाचा देखावा तीन दिवसांपूर्वी निर्माण केला होता. तसेच त्यांच्या हत्येवर आनंदही व्यक्त केला होता. त्यानंतर भारताने अशा कार्यक्रमांना अनुमती देण्याऱ्या कॅनडाच्या प्रशासनावर टीका केली होती. त्यावर, भारत कॅनडाच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करीत आहे, अशी टिप्पणी कॅनडाचे सुरक्षा सल्लागार जॉडी थॉमस यांनी केली होती. या टिप्पणीवर भारताने बुधवारी पुन्हा आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना कॅनडाला इशारा दिला आहे.
गांभीर्य लक्षात घ्या
जेव्हा एखाद्या देशातील नेत्याची हत्या अन्य देशात साजरी केली जाते, तेव्हा तो प्रसंग गंभीरच असतो. तो हलकेपणाने घेणे चुकीचे ठरते. कॅनडाच्या प्रशासनाने या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घ्यावयास हवे होते. हा दुर्लक्ष करण्यासारखा कार्यक्रम नव्हता. भारताच्या भावना कॅनडाने लक्षात घ्यावयास हव्या होत्या. कोणत्याही दोन देशांमधील परस्पर संबंध विश्वासावर आणि परस्पर सन्मानावर अवलंबून असतात. त्या दृष्टीने कॅनडाची कृती द्विपक्षंाrय संबंधांसाठी प्रतिकूल ठरते. अशामुळे अतिरेकी आणि फुटीरतावादी शक्तींना संरक्षण आणि प्रोत्साहन मिळते. त्यामुळे हे टाळले गेले पाहिजे, अशी टीका भारताचे विदेश व्यवहारमंत्री जयशंकर यांनी केली.
काँग्रेसही नाराज
कॅनडामधील या कार्यक्रमावर काँग्रेसनेही नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी ट्विटरवर या कार्यक्रमाची निंदा केली आहे. या कार्यक्रमामुळे भारताचा इतिहास आणि संस्कृती यांचा अवमान झाला आहे. हा कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. पण इंदिरा गांधींची हत्या हा भारतासाठी संवेदनशील विषय आहे आणि या भावनेची दखल कॅनडाने घेणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. भारताने हा विषय जोरकसपणे कॅनडाच्या नेत्यांसमोर मांडावा आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत अशी समज त्या देशाला द्यावी, असे प्रतिपादन काँग्रेसने केले आहे.
राजदूतांकडून निषेध
कॅनडाचे भारतातील राजदूत कॅमेरॉन मॅके यांनी त्यांच्या देशातील या कार्यक्रमासंबंधी खेद व्यक्त केला. आपल्याला याचे दु:ख होते. हा निंदनीय कार्यक्रम होता. कॅनडामध्ये विद्वेष किंवा हिंसाचार यांना कोणतेही स्थान नाही. मी या कार्यक्रमाचा उघड आणि स्पष्टपणे निषेध करतो, असा संदेश त्यांनी दिला आहे.