आजच्या बैठकीत जोरदार चर्चा होण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
रास्तारोको करूनही शनिवारी सकाळपर्यंत कॅन्टोन्मेंट परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला नाही. परिणामी शनिवारी महिलांनी पुन्हा कॅन्टोन्मेंटकडे धाव घेतली. पण एलऍण्डटीने मुबलक पाणीपुरवठा केला नसल्याने पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याचे सीईओनी नागरिकांना सांगितले. त्यामुळे एलऍण्डटी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 7 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बिलाची रक्कम भरली नसल्याचे कारण करून एलऍण्डटीने कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा बंद केला होता. 15 दिवस पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी गुरूवारी कॅन्टोन्मेंट कार्यालयावर मोर्चा काढला होता. ठोस आश्वासन मिळाले नसल्याने खानापूर रोडवर रास्तारोको करून वाहतूक रोखली होती. यावेळी पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेऊन आंदोलन थांबविण्यात आले. पण शुक्रवार आणि शनिवारी देखील कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी पुन्हा कॅन्टोन्मेंटवर मोर्चा काढला.
येत्या दोन दिवसात सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन
एलऍण्डटीने पाणीपुरवठा सुरू केला आहे. पण मुबलक पाणी पुरवठा केला नसल्याने कॅन्टोन्मेंट परिसरात पाणीपुरवठा केला नाही. पाणीपुरवठा बंद केल्याबद्दल एलऍण्डटीला पत्रही लिहिले होते. त्याबाबतचे समर्पक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे ही माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ के आनंद यांनी नागरिकांना दिली. परिणामी नागरिकांनी थेट एलऍण्डटी कार्यालय गाठून अधिकाऱयांना याचा जाब विचारला. तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा केला नसल्याचे सांगण्यात आले. व येत्या दोन दिवसात सुरळीत पाणीपुरवठा करू असे नागरिकांना सांगण्यात आले.
अधिकाऱयांची विशेष बैठक
कॅन्टोन्मेंट पाणीपुरवठा संदर्भात एलऍण्डटी आणि कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांची विशेष बैठक सोमवारी सकाळी 11 वा. कॅन्टोन्मेंट कार्यालयात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या पाणी समस्येबाबत या बैठकीत जोरदार चर्चा होण्याची शक्मयता आहे.