‘पंजाब लोक काँग्रेस’चेही विलिनीकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच, अमरिंदर सिंग यांनी स्थापन केलेला पंजाब लोक काँग्रेस पक्षही भाजपात विलीन करण्यात आला. भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, किरेन रिजिजू, सुनील जाखड, अश्विनी शर्मा आदी याप्रसंगी उपस्थित होते. पंजाबमध्ये शांती आणि सुरक्षेसाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा भाजपप्रवेश महत्वाचा आहे. त्यांच्या पक्षात येण्याने भाजपाची पंजाबमधील ताकद वाढणार असून राज्याच्या विकासात भाजप नजिकच्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल, असे केंद्रीय मंत्री तोमर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गेल्या आठवडय़ात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत सुमारे पाऊण तास बैठक करत राजकीय वाटचालीबाबत चर्चा केली होती. तत्पूर्वी 30 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतल्यानंतर पंजाबच्या विविध मुद्दय़ांवर चर्चा केल्यानंतर राज्य आणि देशाच्या सुरक्षेसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प केला, जो आपल्या दोघांसाठी नेहमीच सर्वोत्कृष्ट आहे आणि राहील, असे ट्विट कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले होते.
अमरिंदर यांचा पक्ष ‘पंजाब लोक काँग्रेस’ही भाजपमध्ये विलीन झाल्यामुळे आता भाजपश्रेष्ठींकडून पंजाबमध्ये पक्षाची पुनर्रचना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांचा कार्यकाळ संपणार असल्याने पंजाबमधील महत्त्वाच्या जबाबदाऱया कॅप्टन आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडे सोपवल्या जाऊ शकतात. पंजाबमध्ये भाजपकडे सध्या फक्त दोन जागा आहेत.