पंजाब लोक काँग्रेसबद्दल लवकरच निर्णय ः अमरिंदर यांना मिळणार मोठी जबाबदारी
वृत्तसंस्था/ पतियाळा
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पक्ष पंजाब लोक काँगेसचे (पीएलसी) भाजपमध्ये विलीनीकरण होणार आहे. हे विलीनीकरण चालू महिन्यातच होणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह सधय विदेशात शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी गेले आहेत. पुढील आठवडय़ापर्यंत ते भारतात परतू शकतात. ते मायदेशी परतल्यावर यासंबंधी प्रक्रिया सुरू होणार आहे. या विलीनीकरणानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांना भाजपकडून मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. विशेषकरून 2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राज्यातील 13 जागांवर लक्ष केंद्रीत करत आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकून नवा पक्ष स्थापन केला होता. पंजाब लोक काँग्रेस पक्षाच्या नावाने त्यांनी पंजाब विधानसभा निवडणूक लढविली होती. या निवडणुकीकरता त्यांनी भाजपसोबत आघाडी केली होती. परंतु त्यांना फारसे यश मिळू शकले नव्हते. पक्ष उमेदवारांसह स्वतः कॅप्टन अमरिंदर देखील पराभूत झाले होते.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यावर मोठय़ा संख्येत काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत जातील अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली होती. काँग्रेसचे आमदार राहिलेले फतेहजंग बाजवा आणि राणा गुरमीत सोढी हे निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झाले. त्यानंतर काँग्रेस नेते गुरप्रीत कांगड, शामसुंदर अरोडा, राजकुमार वेरका आणि बलवीर सिद्धू यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यातील बहुतांश जण हे कॅप्टन अमरिंदर यांचे निकटवर्तीय होते.
काँग्रेसचा निर्णय कारणीभूत
कॅप्टन अमरिंदर सिंह यांना काँग्रेसने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अचानकपणे मुख्यमंत्रिपदावरून हटविले होते. कॅप्टन यांनी या निर्णयाला स्वतःचा अपमान ठरवत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. परंतु कॅप्टन यांना हटवूनही काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला होता. कॅप्टन यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यास कारणीभूत ठरणारे नवज्योत सिंह सिद्धू देखील निवडणुकीत पराभूत झाले. तर कॅप्टन यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले चरणजीत सिंह चन्नी देखील 2 मतदारसंघांमध्ये पराभूत झाले. 2017 मध्ये 77 जागा जिंकणाऱया काँग्रेसला यंदा केवळ 18 जागांवर समाधान मानावे लागले.
कॅप्टन यांची पत्नी खासदार
कॅप्टन अमरिंदर यांच्या पक्षाच्या विलीनीकरणानंतर त्यांच्या पत्नी अन् खासदार परनीत कौर या देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. यासंबंधी कॅप्टन यांची भाजपसोबत चर्चा झाल्यावरच निर्णय घेतला जाणार आहे.