आगामी काळातही नियमावलीमुळे किंमत 5 टक्क्यांपर्यंत वाढणार
वृत्तसंस्था /मुंबई
देशात 1 एप्रिलपासून नवीन उत्सर्जन मानदंड बीएस-6 प्रणाली-2 लागू झाल्याचा परिणाम जाणवू लागला आहे. महागाई वाढल्याने कंपन्या गाड्यांच्या किमती वाढवत आहेत. या वर्षी आतापर्यंत जवळपास सर्वच कंपन्यांनी कारच्या किमती 5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. ही मालिका वर्षअखेरपर्यंत सुरू राहू शकणार असल्याचे संकेतही व्यक्त होत आहेत. जानेवारीमध्ये अनेक मॉडेल्सच्या किमती वाढवल्यानंतर कार कंपन्यांनी मार्च-एप्रिल आणि मेमध्ये पुन्हा किमती वाढवल्या. किया इंडिया आणि एमजी मोटर इंडियाने या वर्षी मार्चमध्ये दुसऱ्यांदा आणि मारुती सुझुकी तसेच महिंद्रा अँड महिंद्रा यांनी एप्रिलमध्ये किमती वाढवल्या आहेत. होंडाने एप्रिलमध्ये काही मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत आणि जूनमध्ये वाढवण्याची योजना आहे. त्याचवेळी, टाटा मोटर्सने मे महिन्यात कार आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती 0.6 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. नवी प्रणाली लागू झाल्यानंतर त्यांना कारमध्ये अतिरिक्त उपकरणे बसवावी लागतील असे कंपनीचे अधिकारी सांगतात. या खर्चाचा काही बोजा हळूहळू ग्राहकांवर टाकला जात आहे.
जून-सप्टेंबरमध्ये किमती वाढू शकतात: तज्ञांचे भाकीत
ऑटोमोबाईल उद्योगातील दिग्गजांच्या मते, या वर्षाच्या सुरुवातीपासूनच कंपन्या हळूहळू किमती वाढवत आहेत. जूनपर्यंत वेगवेगळ्या मॉडेलनुसार 3 ते 20 हजार रुपयांपर्यंत वाढ होईल. सप्टेंबरनंतर, 0.5 ते 2 टक्क्यांपर्यंत ही वाढ राहणार आहे.