शीख दंगल : 8 जूनला सुनावणी : काँग्रेस नेत्यावर जमावाला भडकावल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
1984 च्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित पुल बंगश प्रकरणाची सुनावणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात शुक्रवारी झाली. याप्रसंगी न्यायालयाने सीबीआयच्या पुरवणी आरोपपत्राच्या मंजुरीबरोबरच हे प्रकरण आता एमपी-एमएलए (खासदार/आमदार) न्यायालयाकडे वर्ग केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 8 जून रोजी होणार आहे. सीबीआयच्या आरोपपत्रात काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांचे नाव आहे.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1 नोव्हेंबर 1984 रोजी पुल बंगश भागात जमावाने एका गुऊद्वाराला आग लावल्याने तीन लोक ठार झाले होते. जगदीश टायटलर यांनी केलेल्या भाषणामुळे जमाव भडकल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये ठाकूर सिंग, बादल सिंग आणि गुऊचरण सिंग या तीन शीखांना प्राण गमवावे लागले होते. सीबीआयने टायटलर यांच्यावर भादंवि कलम 147 (दंगल), 109 (प्रवृत्त करणे) आणि 302 (हत्या) असे आरोप ठेवले आहेत.
शीख दंगलीप्रकरणी सीबीआयने टायटलर यांना यापूर्वी तीनदा क्लीनचिट दिली होती. 2007 मध्ये पहिली क्लीनचिट देण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत पुन्हा चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर 2013 मध्ये सीबीआयने पुराव्याअभावी टायटलर यांना पुन्हा क्लीनचिट दिली. डिसेंबर 2015 मध्ये न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा पुढील तपास करण्याचे निर्देश दिले होते.