बहनगा स्थानक सील, महत्वाची कागदपत्रे हस्तगत, मृतदेह ठेवलेली शाळा पाडली
वृत्तसंस्था / बालासोर
काही दिवसांपूर्वी ओडीशाच्या बालासोरनजीक घडलेल्या भीषण रेल्वेअपघाताची चौकशी सीबीआयने सुरु केली आहे. प्रथम टप्प्यात अपघाताशी संबंधित उपकरणे जप्त करण्यात आली असून महत्वाची कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ज्या स्थानकात हा अपघात झाला ते बहनगा स्थानक सील करण्यात आले आहे. अपघातातील मृतदेह नजीकच्या एका शाळेत ठेवण्यात आलेले होते. ती शाळा प्रशासनाने पाडून टाकल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
2 जूनला झालेल्या या अपघातात 280 हून अधिक लोक ठार झाले होते. तर 1 हजारहून अधिक लोक जखमी झाले होते. कोरोमंडल एक्स्पे्रस थांबलेल्या मालगाडीवर आदळून प्रथम हा अपघात झाला. अपघातामुळे या गाडीचे घसरलेले डबे विरुद्ध बाजूकडून येणाऱ्या हावडा-चेन्नई एक्स्प्रेसच्या शेवटच्या दोन डब्यांवर आदळल्याने पुन्हा अपघात झाला होता. सिग्नलच्या कोडमध्ये हस्तक्षेप करण्यात आल्याने अपघात झाल्याचे रेल्वेच्या प्राथमिक चौकशीत आढळून आले. हा घातपात असल्याची शंका यामुळे बळावली असून त्यामुळे सीबीआयकडे तपास देण्यात आला आहे. आता सीबीआयने सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
कागदपत्रे ताब्यात
अपघातासंबंधी सर्व कागदपत्रे ईशान्य रेल्वे विभागाचे प्रमुख आदित्य कुमार चौधरी यांनी सीबीआयला सुपूर्द केली आहेत. त्यांच्यात लॉगबुकचा समावेश आहे. याशिवाय रीले पॅनेल आणि अन्य महत्वाची मानवसंचालित आणि स्वयंसंचालित उपकरणेही सीबीआयने ताब्यात घेतली असून त्यांची बारकाईने तांत्रिक तपासणी होणार आहे. कोणत्याही प्रवासी किंवा मालगाडीला चौकशी पूर्ण होईपर्यंत बहनगा बाजार रेल्वे स्थानकात थांबण्यास अनुमती नाकारण्यात आलेली आहे. मात्र, या नियमाला काही जलदगती गाड्यांचा अपवाद करण्यात आला आहे.
संशय कशासाठी?
हा अपघात घातपाती कृत्ये करुन घडवून आणण्यात आला असल्याचा संशय बळावत आहे. कारण प्रथम कोरोमंडल एक्स्पे्रसला देण्यात आलेला सिग्नल योग्य होता. तथापि, नंतर हा सिग्नल अचानक काढून घेण्यात आला होता. सिग्नल काढून घेण्याचा हा प्रकार बाह्या मानवी हस्तक्षेपाशिवाय शक्य नाही, असे रेल्वे तंत्रज्ञांचे म्हणणे आहे. कारण सिग्नल यंत्रणा स्वयंचलित आणि इलेक्ट्रॉनिक आहे. त्यामुळे एकदा ती कार्यरत झाली की कोणीतरी मुद्दाम हस्तक्षेप केल्याखेरीज ती बंद होत नाही. त्यामुळे हेतुपुरस्सर हा प्रकार घडविण्यात आला आहे, असे आता जवळपास निश्चिपणे मानण्यात येत आहे. आता सीबीआय चौकशीच्या अहवालाची प्रतीक्षा असून त्यातून नेमके सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
प्रतिदिन 170 गाड्या
बहनगा बाजार रेल्वे स्थानकातून प्रतिदिन 170 रेल्वेगाड्यांची आवक जावक होत असते. त्यांच्यापैकी बहुतेक गाड्या या स्थानकावर थांबू नयेत असा आदेश देण्यात आला आहे. मात्र, काही गाड्या थांबविल्या जाणार आहेत. सीबीआय चौकशी एका महिन्यात संपण्याची शक्यता आहे. या चौकशीत या स्थानकाचे स्टेशनमास्टर, इतर अधिकारी, सिग्नलमन, सिग्लल यंत्रणा तज्ञ आणि काही प्रत्यक्षदर्शी यांची स्टेटमेंटस् नोंदवून घेतली जाणार आहेत. तसेच त्यांना सीबीआय अधिकाऱ्यांकडून प्रश्नही विचारले जाऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक सिग्नल यंत्रणा कशी काम करते आणि ती बंद कशी पडते किंवा बंद करता येते, यावर सीबीआय चौकशीत विशेष भर देण्यात येईल, असे बोलले जात आहे.
शाळा पाडली
अपघातानंतर रुग्णालयांमध्ये जागा कमी पडू लागल्याने नजीकच्या एका शाळेत मृतदेह ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता त्या शाळेत आम्ही जाणार नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितल्याने शाळा पाडण्याचा आदेश मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिला. त्यामुळे शाळा पाडण्यात आली. या शाळेत मृतदेह ठेवल्याचे विद्यार्थ्यांनी पाहिल्याने आता त्यांना तेथे बसण्यास भीती वाटू लागली आहे. म्हणून हा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.