सिग्नल यंत्रणेत घातपात केल्याची शक्यता पडताळणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ओडीशात नुकत्याच घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या चौकशीला सीबीआयने प्रारंभ केला आहे. तीन रेल्वेगाड्यांचा समावेश असलेल्या या अपघातात 278 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 1 हजाराहून अधिकजण जखमी झाले आहेत. हा अपघात सिग्नल यंत्रणेत बाह्या हस्तक्षेप झाल्याने घडला, असे स्पष्ट प्रतिपादन रेल्वे अधिकाऱ्यांनी केल्याने हा घातपात असण्याची शक्यता बळावली आहे.
चौकशीची सूत्रे हाती घेतल्यानंतर सीबीआयने अपघाताशी संबंधिक कागदपत्रे आणि साक्षीदारांचे जबाब संकलित करण्यास प्रारंभ केला. सीबीआयने अपघाताचा एफआयआरही सादर केला आहे. तो भारतीय दंड विधान अनुच्छेद 337 (जीव धोक्यात येईल अशी जखम करणे), अनुच्छेद 308 (गंभीर जखम करणे), अनुच्छेद 304 अ (निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत होणे) आणि अनुच्छेद 34 (अनेकांनी केलेला एकच गुन्हा) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यात कटकारस्थानाचा अनुच्छेद जोडण्यात आलेला नाही. मात्र, चौकशीत हे कारस्थान असल्याचे आढळल्यास हा अनुच्छेदही नंतर जोडला जाऊ शकतो. ओडीशा पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
घातपाताची शक्यता का ?
हा अपघात घडण्यासाठी कारस्थान करणीभूत आहे, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण हा अपघात चालकांच्या चुकीमुळे घडला नसल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. तसेच, कोरोमंडल एक्स्पे्रेसला (जी उभ्या असलेल्या मालगाडीवर आदळली) प्रथम योग्य सिग्नल देण्यात आला होता. मात्र, काही क्षणातच तो काढून घेण्यात आला. त्यामुळे ती गाडी मालगाडी उभी असलेल्या ट्रॅकवर जाऊन हा अपघात घडला, असेही स्पष्ट झाले आहे. एकदा दिलेला सिग्नल कोणाच्या तरी बाह्या हस्तक्षेपाशिवाय काढून घेतला जाऊ शकत नाही, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे हा अपघात मुद्दाम घडवून आणला आहे का, हे तपासले जाणार आहे. अपघातानंतर रेल्वे स्थानकाचा स्टेशन मास्टर फरारी आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. तसेच, सिग्नल प्रकरणाची बारकाईने चौकशी केली जाणार आहे.
रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
सरकारचा निष्काळजीपणा या अपघाताला जबाबदार आहे, असा आरोप विरोधकांनी केला असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, भाजपने ही मागणी धुडकावली असून चौकशीचा अहवाल येईपर्यंत थांबा. या भीषण दुर्घटनेचे राजकारण करु नका, असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे. तृणमूल काँग्रेसनेही सरकारवर टीका केली आहे.