सौरभ मुजुमदार कोल्हापूर
चैत्र पौर्णिमा अर्थात डोंगरावरची यात्रा. दख्खनचा राजा जोतिबा देवस्थान ज्याच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक हजेरी लावतात. ज्यातून काही भक्तीच्या अलोट परंपरा जपलेल्या आपण पाहतो. या देवस्थानाला राजर्षी शाहू महाराजांसारख्या महान राजाचा राजाश्रय मिळाला .त्यापैकी त्यांनी दिलेले निवडक आदेश आजही त्यांची या देवाप्रती असणारी निस्सीम भक्ती व प्रजेसाठीची तळमळ आपणास दर्शवितात.
चैत्री पौर्णिमेचा आदेश
इ. स. 1908 ला महाराजांनी महत्त्वपूर्ण आदेश दिला तो प्रामुख्याने देवाच्या चैत्र-यात्रेसंबंधिच आहे. लाखो भाविक जोतिबा चरणी लीन होण्यासाठी डोंगरावर हजेरी लावतात. त्यांच्या स्वच्छतेसाठी मांडव घालणे, पायखाने वगैरेसाठी देवस्थानच्या शिलकी खर्चातून विशेष रक्कम मंजूर केलेली होती. कालांतराने त्यांनी या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना आपला चरितार्थ चालविण्यास शेतीसंबंधी मोफत प्रशिक्षण देण्यासाठी इ.स.1913 च्या 14 ऑगस्टला कृषी प्रदर्शन भरवण्याचा आदेश दिला. ज्या प्रदर्शनामध्ये शेतीसंबंधी अवजारे नांगर, औत, तसेच जनावरे घोडी ,म्हशी ,कुत्री, लढाऊ बकरी यांचा समावेश करून स्थानिक सरकारी कचेरी व शाळांना तीन दिवस सुट्टी देण्यास सांगितले. तसेच हे प्रदर्शन सर्वांना व्यवस्थितपणे पाहता यावे म्हणून यात्रेच्या आदले दिवशी चालू करून पुढे सहा दिवसापर्यंत असावे असे या आदेशात म्हटलेले आहे.
भक्तांची व्यवस्था
जोतिबा देवाच्या डोंगरावर राजर्षी शाहूंनी आपल्या प्रजेला सावलीसाठी हजारो झाडे लावली. इतकेच काय तर या झाडांना पाणी मिळावे म्हणून विशेष खर्चासाठी रुपये 87 मंजूर केल्याचे 3 डिसेंबर 1907 च्या आदेशावरून समजते. समाजातील तळागाळातील लोकांना पाणी मिळावे यासाठी त्यांनी डोंगरावरील या लोकांचे पाण्यासाठी हाल होताना पाहिले व त्वरित त्यांच्यासाठी विहीर खोदावयाचा आदेश इ.स. 1894 रोजीच्या पत्रातून दिला.
देवाचे सेवेकरी
ज्योतिबा देवाचा माहूत हा आपली सेवा देवाच्या चरणी मन:पूर्वक करीत असल्याचे पाहून राजर्षी शाहू महाराजांनी त्या माहुतास आपल्या विशेष अधिकारातून इतरही देवाच्या सेवा करण्याचा आदेश बहाल केल्याचे 17 नोव्हेंबर 1911 च्या आदेशामध्ये आहे.
देवाची नित्य पूजा अर्चा, दैनंदिन विधी, यामध्ये काहीही व्यत्यय येऊ नये म्हणून अनेक दानपत्रे करवीरच्या छत्रपतींनी दिल्याचे समजते. ज्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी इ. स. 1905 ला देवाची तयार पालखी करण्यासाठी दोनशे अष्ठ्याहत्तर रुपये सहा आणे दिल्याची नोंद आहे.
रथोत्सव दख्खनच्या राजाचा
5 फेब्रुवारी 1913 चा आदेश हा महत्त्वपूर्ण असून संशोधकांकडून त्याचा अभ्यास होण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे श्री जगदंबेचा ( करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा ) रथ आहे. त्याचप्रमाणे श्री केदारलिंग देवाचा रथ कात्रे टे स्कूलमधून म्हणजेच आत्ताचे छत्रपती शिवाजी टे.स्कूल (ज्याला पूर्वी ओबरायन टेक्निकल स्कूल म्हणूनही ओळखावयाचे ) येथून करून घेण्यासाठी रुपये 866 खर्चासाठी मंजूर केल्याची नोंद आहे. इतकेच काय तर रथाच्या दुरुस्तीसाठी देखील काही रक्कम मंजूर केल्याचे समजते .दख्खनच्या राजाचा रथोत्सवाचा अभ्यास होण्याची गरज आहे. जोतिबा देवासाठी लागणारे रेशीम कापड वस्त्र निर्मितीसाठी गायमुखाजवळच स्वतंत्र रेशीम कारखाना उभा करणारे हे राजश्री शाहू राजे खरोखरच देवभक्ती पुढे उल्लेखनीयच होते.
प्लेगच्या महा रोगाच्या वेळी जोतिबा देवाची यात्रा जनतेच्या संरक्षणासाठी बंद करणे इतकेच काय तर हा प्रादुर्भाव कमी झाल्यावर हीच यात्रा अनियंत्रित स्वरूपात करू द्यावी असाही महत्त्वपूर्ण आदेश राजांनी दिलेला होता. डोंगर परिसरातील रस्ते नवीन करणे, झाडे लावणे, विविध सेवा सुविधा उपलब्ध करणे अशी विविध माहिती या आदेशावरून उजेडात आली. देवाच्या भक्तीसोबत आपल्या राजाची ही कीर्ती जनतेसमोर येणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे.
करवीरच्या छत्रपती घराण्याकडून मिळालेले योगदान हे सदैव जोतिबा देवाच्या भक्तांना सेवा सुविधा मिळाव्यात यासाठीच होते. जोतिबा देवस्थानची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती असणारी अजूनही उजेडात न आलेली कागदपत्रे साक्षात देवाच्या सानिध्यातच असणाऱ्या कार्यालयात असून त्याचे सखोल संशोधन तसेच जतन व संवर्धन होणे अत्यंत गरजेचेच आहे.
गणेशकुमार खोडके, अभिलेखाधिकारी, पुराभिलेखागार विभाग, कोल्हापूर