ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी सत्ता स्थापन केल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार? याची चर्चा होती. त्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ?(Rajesh Kshirsagar) आमदार प्रकाश आबिटकर, विनय कोरे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड करण्यात आल्यानंतर कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर चंद्रकांत पाटील यांचे नाव कोरले जाण्याची शक्यता आहे. आज याबाबत घोषणा होईल.
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने विरोधकांकडून टीकाटिप्पणी सुरू होती. त्यानंतर आज मंत्रिमंडळ विस्तार होत असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागली आहे. असे असताना कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसणार? अशी चर्चा गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात रंगत होती. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता असून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे यांच्या पालकमंत्री पदाच्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्रीपदी आज घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा : मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला; आज ११ वाजता होणार शपथविधी
विधानपरिषद मार्गे पालकमंत्री पदावर जात असल्याची चर्चा
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी मागील विधानसभा निवडणुकीत पराभव केला. त्यानंतर ठाकरे सरकारने त्यांची राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्षपदावर वर्णी लावली. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत क्षीरसागर यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. मात्र महाविकास आघाडीचा धर्म पाळत त्या ठिकाणी काँग्रेसच्या जयश्री जाधव यांच्या विजयासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवणी केली. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चाळीस आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी देखील ठाकरे गटातून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. राज्यपाल नियुक्त आमदारातून विधान परिषदेवर क्षीरसागर यांची वर्णी लागणार अशी चर्चा रंगू लागली होती. त्यातूनच कोल्हापूरचे पालकमंत्री पद घेण्याची चर्चा देखील होती.