ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार जिंकतील तसेच राज्यातील मोठा नेता या निवडणुकीत पराभूत होईल असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. आमचं नियोजन पक्कं आहे. वाटल्यास महाविकास आघाडीने आमच्याशी चर्चा करून त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.
राज्याला जीएसटी परतावा म्हणून केंद्राकडून १४ हजार कोटी मिळाले. याचा वापर शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी नाही. पेट्रोलवरचे व्हॅट कमी कऱण्यासाठी नाही मग जमिनी खरेदीसाठी या पैशांचा वापर करणार आहात का असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.
महाविकास आघाडीवर निशाणा साधताना ते म्हणाले, विरोधकांना झोपेतही भाजप दिसते. आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांशी भांडतील, पण सरकार पडू देणार नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की सरकार पडले तर पुन्हा भाजपचीच सत्ता येईल असा टोलाही लगावला. पुन्हा आम्ही सत्तेत आलो की सगळा हिशोब चुकता करू असा इशाराही दिला.