ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी पोहोचले आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील आज तिथे जाणार होते. पण पुन्हा एकदा आपल्याला शाईफेकीची धमकी मिळाल्याचा दावा करत त्यांनी कोरेगाव भीमाला जाणे टाळले. त्यांनी घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत विजयस्तंभाला मानवंदना दिली.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत एक पत्रक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, वंचितांच्या शैक्षणिक विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मी दोनवेळा दिलगिरी व्यक्त करुनही माझ्या विधानाचा विपर्यास करुन माझ्यावर भ्याडपणे शाईफेक झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणणाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तुडवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती, आताही मी कोरेगाव भीमाला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनास आलो तर पुन्हा शाई फेकू म्हणून धमकी आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळय़ाही झेलण्यास तयार आहे, परंतु हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी कोरेगाव भिमाला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये, अशा एखाद्या घटनेमुळे गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची सुप्त इच्छा आहे. मोठय़ा प्रमाणात माझ्या माता, भगिनी, वयस्कर मंडळी, लेकरं श्रद्धेने आली असतील. येत असतील तर त्यांची श्रद्धा व सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत. त्यामुळे मी माझ्या घरी आदरणीय बाबासाहेबांना वंदन करून विजयस्तंभास मानवंदना देणार आहे. तसेच विजयस्तंभ परिसर विकासासाठी शासनाने घोषित केलेल्या 100 कोटी निधीची अंमलबजावणी करणार आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
अधिक वाचा : जयस्तंभाबद्दल आक्षेपार्ह विधान भोवलं; करणी सेनाप्रमुखावर गुन्हा