विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांचे मत
बेळगाव : प्रत्येक गोष्टीवर शासन प्रशासनावर टीका करण्याऐवजी प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. चांगल्या उपक्रमांतून सामाजिक परिवर्तन घडू शकेल, असा विश्वास बेळगावच्या सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी व्यक्त केला. रविवारी कॉलेज रोड येथील महिला विद्यालयात जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारतर्फे नूतन कार्यकारिणीचा संयुक्त अधिकारग्रहण समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आरती भंडारे, जायंट्स सेंटर कमिटीचे सदस्य दिनकर अमीन, फेडरेशन प्रेसिडेंट तारादेवी वाली, एलआयसी अधिकारी पी. जी. घाडी, मनोहर पाटील उपस्थित होते. डॉ. आरती भंडारे यांनी पर्यावरण अबाधित राखण्याबाबत मनोगत व्यक्त केले. जायंट्स परिवारच्या नूतन अध्यक्षपदी किरण वेसणे, उपाध्यक्ष विजय खोत, प्रदीप हिरेमठ, खजिनदार बलराम गावडे, प्रशासक गणेश गुंडप आदींची निवड करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व कार्यकारिणीला शपथ देण्यात आली. जायंट्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष अनंत जांगळे, संचालक सल्लागार राजू माळवदे, प्रवीण त्रिवेदी, दीपक हावळ, एम. गंगाधर, श्रीधन मलिक व अन्य सदस्य उपस्थित होते.