ऑनलाईन टीम / मुंबई :
औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतरण करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून जोर धरत आहे. त्यावरुन भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी यासंदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीनगरचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नसल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.
टोपे म्हणाले, औरंगाबादला लोक गरजेनुसार आणि सोयीनुसार संभाजीनगर म्हणतात. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंडय़ावर नाही. हे त्या-त्या पक्षाचे अजेंडे असतात. त्यावर माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही. राष्ट्रवादीचा अजेंड्यावर तर हा विषय नाहीच. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना आनंद वाटतो. आज आपल्यासमोर पाण्याचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे. रस्ते, वीज यासारखेही महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्याकडे आपण लक्ष्य देऊ, असेही टोपे म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करु, असे म्हटले होते. आता 14 मेला मुंबईत झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर. नामांतर करायची गरजच नाही. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जाहीर सभेत शिवसेनेवर हल्ला चढवला होता.