पाटो – पणजी येथील पर्यटन भवनात कार्यक्रम : नियम पाळा, अपघात टाळा – जीव वाचवा : मुख्यमंत्री
प्रतिनिधी /पणजी
रस्ता अपघातात बळी पडलेल्यांच्या 23 वारसदारांना आर्थिक नुकसान भरपाई योजनेंतर्गत प्रत्येकी रु. 2 लाखाचे धनादेश वितरीत करण्यात आले. दरवर्षी सरासरी 250 जण अपघातात बळी पडतात अशी आकडेवारी सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाहतूक नियम पाळा, अपघात टाळा – जीव वाचवा, असे आवाहन केले.
पाटो – पणजी येथील पर्यटन भवनात हा भरपाई देण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी डॉ. सावंत यांच्या समवेत वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. सावंत यांनी 2012 ते 2021 पर्यंतची अपघाताची आकडेवारी सादर केली. प्रतिवर्षी कधी 250 तर कधी 300 च्या आसपास बळी गेल्याचे ते म्हणाले. त्या हिशोबाने दरवर्षी सरासरी 250 च्या आसपास लोक अपघातात मृत्यू पावतात. घरातून बाहेर निघाल्यानंतर पुन्हा घरी आपली कोणीतरी वाट पहातोय याचे भान सर्वांनी ठेवावे. वाहतूक खाते व सार्वजनिक बांधकाम खाते यांनी सर्वेक्षण केले असून येत्या वर्षभरात योग्य त्या ठिकाणी सूचना फलक, वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
वाहतूक खात्याने आतापर्यंत 232 कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून प्रत्येकी रु. 2 लाख भरपाई दिल्याचे गुदिन्हो यांनी नमूद केले. या भरपाईसाठी अजून अनेक अर्ज प्रलंबित असून त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत पुरविण्याचे आश्वासन गुदिन्हो यांनी दिले.
नवीन आयटी उद्योगांना अनुदान धनादेश वितरीत
त्याच ठिकाणी आयटीमंत्री रोहन खंवटे यांचा वेगळा कार्यक्रम झाला. त्यांनी गोव्यात नव्याने आयटी उद्योग सुरु करणाऱया काही कपन्यांना अनुदानाचे धनादेश वितरीत केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार चंद्रकांत शेटये त्यावेळी उपस्थित होते. त्यावेळी विराज मराठे व जान्हवी जोशी यांनी ‘एजकेअर’ हे ऍप विकसित केले म्हणून त्यांचा डॉ. सावंत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. आयटी तसेच पर्यटन खात्याचे अनेक अधिकारी त्यावेळी उपस्थित होते.
सीसीटिव्हीद्वारे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणार : माविन गुदिन्हो
राज्यातील प्रमुख वाहतूक जंक्शने, अपघात प्रवण क्षेत्रे, सार्वजनिक जागा या ठिकाणी सरकारतर्फे सीसीटिव्ही कॅमेरा बसवण्यात येणार असून त्याच्या माध्यमातून वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. वाहतूक नियम मोडणाऱया वाहनांवर देखील करडी नजर ठेवली जाणार आहे. दिवस-रात्र सीसीटिव्ही कॅमेरातून वाहतुकीचे नियंत्रण केले जाणार आहे. पीपीपी म्हणजे सार्वजनिक – खासगी – भागिदारीच्या स्वरुपात ते टिव्ही – कॅमेरा बसविण्याचे काम होणार असल्याचे गुदिन्हो यांनी नमूद केले. वाहतूक कार्यालयातून सीसीटिव्ही कॅमेराचा वापर करुन वाहतुकीवर देखरेख करण्यात येणार आहे.