जगातील सर्वात उंच पूल घालणार पर्यटकांना भुरळ ः काश्मीरच्या सौंदर्यात भर
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच सिंगल-कमान रेल्वे पूल बांधला जात आहे. शनिवारी पुलाच्या कमानीवरील अंतिम डेकचे काम पूर्ण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून पुलावर तिरंगा ध्वजही फडकवण्यात आला. या पुलाच्या बांधकामानंतर श्रीनगर रेल्वेच्या माध्यमातून उर्वरित भारताशी जोडले जाणार आहे. 1.315 किमी लांबीचा चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे. रेल्वेमार्गाने काश्मीर गाठण्याच्या दिशेने हे आणखी एक मोठे पाऊल असणार आहे. आता डिसेंबर महिन्यापर्यंत रेल्वे रुळ टाकण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
काश्मीरला साकारला जात असलेला हा कमान पूल जम्मू विभागातील रियासी जिह्यातील चिनाब नदीवर बांधला जात आहे. त्याच्या कमानीची उंची चिनाब नदीच्या पात्रापासून 359 मीटर आहे. या रेल्वेपुलामुळे सलाल-ए आणि दुग्गा रेल्वेस्थानके दोन्ही बाजूंनी जोडली गेली आहेत. हा पूल भूकंप प्रतिरोधक बनवला जात आहे. आठ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप सहन करण्याची क्षमताही या पुलाची आहे. तसेच हा पूल ताशी 260 किमी वाऱयाचा वेगही सहन करू शकतो. पुलाला 93 डेक भाग आहेत. त्याचे वजन प्रत्येकी 85 टन आहे. उधमपूर ते बारामुल्ला या 272 किमी लांबीच्या रेल्वे प्रकल्पातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
अनेक पातळीवर अव्वल
17 खांब असलेल्या पुलाची लांबी 1315 मीटर आहे. त्याच्या बांधकामात 1,486 कोटी रुपये खर्चून 28,660 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. स्थापित कमान 10,619 मेट्रिक टन वजनाची आहे. संरचनेत वापरलेले स्टील उणे 10 अंश सेल्सिअस ते उणे 40 अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानातही टिकून राहणार आहे. या पुलाचे किमान आयुर्मान 120 वर्षे आहे. या पुलावर 100 किमीच्या वेगाने रेल्वेगाडय़ा चालवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
रेल्वेमार्गावर 119 किमीचे 38 बोगदे
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी या प्रकल्पाचे काम करत आहे. उधमपूर ते बारामुल्ला या 272 किमी लांबीच्या रेल्वेमार्गावर 38 बोगदे असतील. बोगद्यांची लांबी 119 किमी आहे. देशातील सर्वात लांब 12.75 किमी लांबीचा रेल्वे बोगदाही त्यात समाविष्ट आहे. तसेच या मार्गात 927 लहान-मोठे पूल असतील. सध्या बनिहाल ते बारामुल्लापर्यंत रेल्वे वाहतूकही सुरू आहे. आता केवळ कटरा ते बनिहालदरम्यान ट्रक बांधणे बाकी आहे.