कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांचे प्रतिपादन, ; वारखंड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
पेडणे : राजमाता जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना राजे बनवले. हे संस्कार प्रत्येक माता भगिनींनी आपल्या मुलावर करावे, दुसऱ्यांच्या घरात शिवाजी जन्माला येण्याअगोदर तो आपल्या घरी जन्माला यावा त्यासाठी तशा प्रकारची शिक्षण पद्धती, संस्कार आवश्यक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयोजन आणि कित्येक वर्षे नियोजन केल्यामुळे ते रयतेचे राजे बनले, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी केले. वारखंड येथील श्री शांतादुर्गा स्पोर्ट्स अॅन्ड कल्चरल क्लबतर्फे उभारण्यात आलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेश गोवा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, तोरसे जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे, वारखंड सरपंच गौरी जोसलकर, उपसरपंच वसंत नाईक, श्री शांतादुर्गा माऊली देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परब, श्री शांतादुर्गा स्पोर्ट्स अॅण्ड कल्चरल क्लबचे अध्यक्ष अमित परब, माजी अध्यक्ष सखाराम परब, पेडणे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, कविता कांबळी, पंच सदस्य देविदास च्यारी, ऊपेश म्हावळणकर, विनायक परब, मयुरी तुळस्कर आदी उपस्थित होते. सुऊवातीला फोंडा येथील जगदंबा ढोल ताशाच्या गजराने आणि स्थानिक कलाकारांनी लेझीम नृत्याद्वारे मान्यवरांचे आगमन पुतळ्याच्या ठिकाणी झाले. त्या ठिकाणी बसवलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शांतादुर्गा स्पोर्ट्स अॅण्ड क्लबने जनहितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी दिलेले बलिदान समोर ठेवून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार जनमानसात पोचवायचे आहेत. महाराजांचा इतिहास आणि त्यांचे कर्तुत्व सातासमुद्रापलीकडे पोहोचलेला आहे, असे गोविंद गावडे म्हणाले.
महाराजांचे गुण आत्मसात करा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शंभर गुणांपैकी केवळ दहा टक्के गुण जरी आत्मसात केले, तरी आपल्याला एक एक यश मिळवताना त्यांच्या कार्याची माहिती मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज केवळ राजकर्ते, राजा नव्हते तर ते जगातील एक धुरंदर राजकर्ते आणि रयतेचे राजे होते असे गावडे म्हणाले.
मोपा विमानतळावरही महाराजांचा पुतळा उभारावा : तानावडे
छत्रपती शिवाजी महाराज आमच्यात नसले तरी त्यांचे कार्य आज किती वर्षापासून चालू आहे. आमच्या मनामनात ते आहेत. शिवाजी महाराज रयतेचे राजा होते. त्यावेळी सर्वत्र वीज, रस्ते होते की नाही हे माहीत नसले तरीही त्याकाळची प्रजा सुखी होती. आज युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपापल्या गावांमध्ये उभारलेला आहे. मनोहर इंटरनॅशनल विमानतळाच्या समोर शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी वारखंडवासियांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे केले.
सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारे राजे : आर्लेकर
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाज, सर्व धर्माला एकत्रित घेऊन जाणारे राजे होते. त्यामुळेच ते रयतेचे राजे बनले. त्यांचे कार्य आजही प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आणि प्रतिमा असणे आवश्यक आहे, असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले. शांतादुर्गा स्पोर्ट्स अॅड कल्चरल क्लबचे अध्यक्ष अमित परब यांचेही भाषण झाले. यावेळी विशेष योगदान दिलेल्या संतोष कोरखणकर व प्रवीण बुगडे यांचा गौरव करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पगुच्छ राजीव सावंत, संकेत परब, रामदास सावंत, अजित परब आदीने प्रदान केले. स्वागत, सूत्रसंचालन राजमोहन शेट्यो यांनी केले. आभार कुलदीप परब यांनी मानले.