ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत ४६ पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचं चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून भाषण केलं. यावेळी त्यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना आणि एकनाथ शिंदे यांना देखील चांगलंच सुनावलं आहे. स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षप्रमुख पदावर निवड झाली तेव्हाची आठवण सांगितली. तेव्हा पक्षांतर्गत नाराजीविषयी बोलताना बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका त्यांनी सांगितली. “मी बाळासाहेबांना म्हणालो हे सगळे काय करतायत ते तुम्ही तरी थांबवा. ते मला म्हणाले मी मध्ये नाही पडणार. बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ दे. मग शेवटी तो ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना विचारलं होतं की हे जे सगळं केलंय, ते तुम्हाला मान्य आहे का?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शिवसेना कार्यकारिणीत उपस्थितांनी गद्दारांना परत घेऊ नका, अशी मागणी उद्धव ठाकरेंना केली. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना परत घेणारच नाही असे बोलले. शिवसेना निखारा आहे. त्यावर पाय ठेवला तर जाळून टाकू असा इशारा देखील ठाकरेंनी दिला. दरम्यान या कार्यकारिणीत महत्वाचे पाच ठराव देखील मांडण्यात आले आहेत. यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही असा ठराव ही राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे.
बैठकीत कोणते ठराव मंजूर?
निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना असतील. हा पहिला ठराव पारित करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. याबैठकीत हा ठराव करण्यात आला.
शिवसेनेशी बेईमानी करण्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार ही राष्ट्रीय कार्यकरणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना देत आहे असा ठराव ही या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा ठराव शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडला होता.
त्याशिवाय, बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. या ठरावामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे.
शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.