बेळगाव : वळीव पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाल्यातील कचरा अडकून काही ठिकाणी नाले तुडुंब भरत आहेत. नाल्याचे पाणी शिवारामध्ये तसेच काही नगरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे शहरातील नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील लेंडीनाला, बळ्ळारी नाला यासह इतर लहान नाल्यांची तातडीने खोदाई करून त्यामधील कचरा बाजूला काढावा, अशी मागणी होत आहे. यावर्षी वळिवाचे उशिराने आगमन झाले आहे. त्यामुळे नाले तसेच इतर समस्यांकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील कचरा नाल्यांमध्ये साचत असल्याने पाण्याचा निचरा होणे अवघड झाले आहे. शहरातील नाल्यांजवळच अनेकांनी इमारती उभ्या केल्या आहेत. तसेच काहींनी दुकानेही थाटली आहेत. त्यामुळे त्यांना धोका पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाल्यातील पाणी निचरा होत नसल्यामुळे अनेक नगरांना पुराचा फटका दरवर्षीच बसत आहे. तेव्हा नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांतून होत आहे.
जलपर्णी, कचरा, झाडे-झुडपे वाढल्याने शेतीला फटका
शहरातील लेंडी नाला हा बळ्ळारी नाल्याला जोडला गेला आहे. मात्र या नाल्यांमध्ये जलपर्णी तसेच कचरा, झाडे-झुडपे वाढली आहेत. त्यामुळे यावर्षीही बळ्ळारी व लेंडी नाल्याजवळील शेतीला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बळ्ळारी नाल्यावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे बॉक्स बुजले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा पूर्वेकडच्या बाजूला होणे कठीण झाले आहे. यासाठी बेळगाव शेतकरी संघटनेने अनेकवेळा निवेदने तसेच आंदोलने केली आहेत.
गाळ साचल्याने पाण्याचा निचरा होणे अवघड
मागीलवेळी काही प्रमाणात खोदाई करण्यात आली होती. मात्र यावेळी पुन्हा त्यामध्ये कचरा तसेच इतर साहित्य व गाळ साचला असून पाण्याचा निचरा होणे अवघड झाले आहे. तेव्हा पावसाळ्यापूर्वी त्या सर्व बॉक्समधील कचरा काढून ते खुले करावेत, अशी मागणी बेळगाव शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. लेंडी नाल्याजवळ असलेल्या शिवारामध्ये पाणी शिरत आहे. त्यामधील पिके पूर्णपणे वाया जात आहेत. माजी आमदार अनिल बेनके यांनी मागील वर्षी नाल्याची खोदाई करून बांधावर मातीचा भर देखील टाकला होता. मात्र ते काम पूर्णपणे झाले नाही. यामुळे यावर्षीही पुन्हा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.