जोंधळा, भाजीपाला-बागायतदारांना फटका बसण्याची शक्यता
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाबरोबरच काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. शिवारामध्ये जोंधळा, भाजीपाला ही पिके आहेत. काही भागामध्ये अजूनही कडधान्ये पिकेदेखील काढायची आहेत. त्यामुळे त्यांनाही फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. बेळगाव तालुक्यामध्ये केवळ हवेवर येणारा जोंधळा पेरला जातो. तो जोंधळा सर्वसाधारण मार्चअखेरच्या दरम्यान कापणीस येतो. मात्र, तत्पूर्वीच ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा होत असल्यामुळे जोंधळा काळा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. याचबरोबर सध्या असलेल्या भाजीपिकांनाही हा पाऊस मारक ठरणार आहे. सध्या शेतकरी वाळलेला चारा रचण्याचे काम करत आहेत. याचबरोबर इतर कामांमध्ये गुंतला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये काजू तसेच आंबा पिकाचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले जाते. या पावसामुळे त्या पिकांचा मोहोरदेखील खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा होत असला तरी वळीव पावसाच्यावेळी जोरदार वाराही येण्याची भीती असते. त्यामुळे आंबा व इतर पिकाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. एकूणच वळिवाची चाहूल लागली आहे तर काही भागामध्ये पाऊसदेखील कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे.