पुणे / वार्ताहर :
Cold will increase in Maharashtra पुढील दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने घटण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मंगळवारी राज्यात गोंदिया येथे सर्वात कमी 11.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.
मध्य महाराष्ट्रातील तुरळक जिल्हे तसेच विदर्भात थंडीचा कडाका अधिक आहे. अद्यापही कोकणात थंडीचा जोर म्हणावा तितका नाही. मध्यंतरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्याच्या प्रभावामुळे काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. यामुळे थंडीचा प्रभाव देखील कमी झाला. मात्र, आता वायव्य भारत तसेच मध्य प्रदेशात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातही हळूहळू किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने घटण्याचा अंदाज आहे.
अधिक वाचा; बीटी बियाणांचा वापर करण्यास परवानगी द्यावी : रघुनाथदादा पाटील
आणखी एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती
दक्षिण अंदमानचा समुद्र व लगतच्या भागात हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याच्या प्रभावामुळे बुधवारी दक्षिणपूर्व बंगालच्या भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे. हे क्षेत्र पश्चिम-उत्तरपश्चिमेच्या दिशेने प्रवास करीत 18नोव्हेंबरपर्यंत त्याची तीव्रता वाढणार आहे. यामुळे दक्षिणेकडच्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे.
राज्यातील प्रमुख शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये :
कुलाबा 24, सांताक्रूझ 21.6, अलिबाग 20.3, रत्नागिरी 22.6, डहाणू 20.5, पुणे 15.4, जळगाव 15.7, कोल्हापूर 20.1, महाबळेश्वर 15.4, नाशिक 15.2, सांगली 19.1, सातारा 17.4, सोलापूर 18.9, औरंगाबाद 13, परभणी 15.2, नांदेड 16, अकोला 16, अमरावती 14.1, बुलढाणा 15.7, ब्रह्मपुरी 15.3, चंद्रपूर 15.8, नागपूर 13.4, वाशिम 16.6, वर्धा 13.6, पणजी 23.8.