प्रशिक्षक-सहायक पथकातील सदस्यांनाही गौरवले, नवी स्पोर्ट्स इकोसिस्टिम विकसित करण्याची महत्त्वाकांक्षा,
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बमिर्गंहममध्ये अलीकडेच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 61 पदके जिंकणाऱया भारतीय ऍथलिट्सचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. केंद्रीय क्रीडामंत्री व माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर व क्रीडामंत्री निसिथ प्रामाणिक आदी मान्यवरांसह सर्व पदकजेते आणि प्रशिक्षक उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकून देणारे ऍथलिट व त्यांच्या प्रशिक्षकांचे यावेळी खास अभिनंदन केले. यंदाच्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य व 23 कांस्यपदकांची कमाई केली.
देश अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य महोत्सव साजरा करत असताना खेळाडूंच्या कठोर मेहनतीला या रुपाने लक्षवेधी यश मिळाले, याचा मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला. मागील काही आठवडय़ात देशाने विविध खेळांमध्ये स्पृहणीय यश मिळवले. तसेच प्रथमच चेस ऑलिम्पियाड स्पर्धा भरवून ती यशस्वी करुन दाखवली, याचाही त्यांनी येथे संदर्भ दिला.
सर्व ऍथलिट्सना संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘आपण सर्व जण बर्मिंगहममध्ये विविध स्पर्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत असताना येथे कोटय़वधी देशवासी मध्यरात्रीपर्यंत जागून आपले इव्हेंट्स पाहत होते. अनेक जण तर अलार्म लावून झोपायचे, जेणेकरुन ऍथलिट्सच्या परफॉर्मन्सबाबत अपडेट राहता येईल. वास्तविक, भारताने आणखी बरीच पदके जिंकली असती. पण, काही पदके अगदी निसटत्या फरकाने हुकली. तरी चार नव्या खेळांमध्ये यंदा मिळवलेले यश आश्वासक आहे. लॉन बॉल्स ते ऍथलेटिक्सपर्यंत ऍथलिट्सनी अतिशय अव्वल कामगिरी साकारली. ही कामगिरी युवा पिढीतील खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल, असा मला विश्वास वाटतो’.
महिला ऍथलिट्सची प्रशंसा
‘मुष्टियुद्ध, ज्युडो, कुस्तीतील महिला गटात भारताने यश मिळवले, त्यांचाही पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला. 31 पदके राष्ट्रकुल पदार्पण करणाऱया ऍथलिटनी जिंकले, ते आश्वासक असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यलढय़ात जी वैशिष्टय़े आढळून आली, त्याची प्रचिती या ना त्या निमित्ताने दिसून येते आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या ऍथलिट्सनी मिळवलेले यश तेच दाखवून देते’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थितीतून भारताने आपल्या नागरिकांना तर मायदेशी सुरक्षित आणलेच. शिवाय, अन्य देशातील नागरिकांना त्यांच्या-त्यांच्या भूमीत सुरक्षित कसे पोहचवता येईल, याचीही तजवीज केली. भारताच्या ताकदीचे हे प्रतीक आहे. खेलो इंडियाच्या व्यासपीठावर यशस्वी खेळाडूंचा देशवासियांना अभिमान आहे. टॉप्स (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम) उपक्रमाचे फलित आता दिसून येते आहे. कोणतीही गुणवत्ता मागे राहणार नाही, अशी स्पोर्ट्स इकोसिस्टीम आपल्याला विकसित करायची आहे’, असे मोदी याप्रसंगी म्हणाले.
प्रशिक्षक, सहायक पथकाचा गौरव
खेळाडूंच्या यशात मोलाचा वाटा असलेल्या प्रशिक्षक, क्रीडा प्रशासक व सहायक पथकातील सदस्यांचेही पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले. आगामी आशियाई व ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंनी कसून सराव करावा, असे आवाहन त्यांनी केले.
हॉकीपटू ज्योती म्हणाली, वरिष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले
यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा माझ्यासाठी पहिली मल्टि-डिसिप्लिन इव्हेंट होती आणि या पहिल्याच स्पर्धेत संघाने कांस्य जिंकले, हे माझ्यासाठी विशेष अभिमानाचे आहे. संघातील प्रत्येक सदस्याने घेतलेल्या मेहनतीची पोचपावती या कांस्यपदकाच्या माध्यमातून मिळाली, असे भारतीय महिला हॉकीपटू ज्योतीने नमूद केले. भारतीय पहिला संघाने कांस्य जिंकत या स्पर्धेतील 16 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणला. त्या पार्श्वभूमीवर ज्योती बोलत होती.
सोनिपतची ही युवा हॉकीपटू पुढे म्हणाली, ‘राष्ट्रकुल स्पर्धेतील पूर्ण अनुभव रोमांचक होता. आम्ही घाना, वेल्स व कॅनडाविरुद्ध जिंकलो. मात्र, इंग्लंडविरुद्ध साखळी फेरीत पराभूत झालो. वास्तविक, आम्ही पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार नव्हतो. मात्र, तरीही कांस्य जिंकण्यात यशस्वी ठरलो. माझ्यासाठी हे व्यासपीठ नवे होते. पण, सहकारी खेळाडू व प्रशिक्षक पथकातील सदस्यांमुळे मला माझा खेळ सुधारता आला. मुख्य प्रशिक्षक स्कॉपमनचा माझ्या यशात मोलाचा वाटा राहिला. सहजपणे चेंडू कसा हाताळायचा, नियंत्रण कसे कायम राखायचे, यावर तिने भर दिला आणि ते माझ्यासाठी निर्णायक ठरले’.