स्वस्त धान्य दुकानमालकांना आश्वासन : धान्य हाताळणी, वितरणादरम्यान होते नुकसानी,प्रदीर्घ काळापासून होती मागणी
पणजी : अन्नधान्य वितरण तसेच धान्याची हाताळणी करताना होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी यासंबंधी राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानमालकांची प्रदीर्घ मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. नागरी पुरवठा खात्याने अशा नुकसानीची भरपाई मिळवून देण्यास मंजुरीसाठी हा विषय सरकारसमोर ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. अखिल गोवा स्वस्त धान्य दुकानमालक संघटनेतर्फे ही मागणी करण्यात आली होती. स्वस्त धान्य दुकानांना गोदामातून धान्य वाटप करताना आणि त्याचे ग्राहकांना वितरण करताना मोठ्या प्रमाणात धान्य सांडते. त्यामुळे होणारी नुकसानी दुकान मालकांनाच सहन करावी लागत होती. त्यावर उपाय म्हणून सरकारने त्यांना दोन टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. ही नुकसान भरपाई न मिळाल्यास स्वस्त धान्य दुकाने चालविणे व्यवहार्य होणार नाही. त्यापेक्षा ती बंदच करण्याचा विचार असल्याचे संघटनेने म्हटले होते. मोठ्या प्रमाणात धान्य हाताळणाऱ्या स्वस्त धान्य दुकान मालकांसाठी दोन टक्के ही खूप मोठी रक्कम आहे. त्यासंबंधी आठवडाभरापूर्वी खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.
एफसीआयकडूनही सूचना
त्यावेळी खात्याच्या प्रभारी संचालकांनी संघटनेच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना भारतीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) सर्व स्वस्त धान्य दुकानांना होणारी नुकसानी हाताळण्यासंबंधी माहिती मिळाली असल्याचे सांगितले. त्यानुसार हाताळलेल्या धान्याच्या एकूण प्रमाणावर 1 ते 1.5 टक्का वास्तविक भरपाई देण्याचे एफसीआयने सूचविले आहे. त्यामुळे आता गोव्यातील स्वस्त धान्य दुकानांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यासंबंधी लवकरच सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, या आश्वासनाची पूर्तता होण्याची आता स्वस्त धान्य दुकानमालक वाट पाहात आहेत. अन्यथा दुकाने बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.