कृष्णात चौगले/ कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण नळपाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांच्याविरोधात काही लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता रा. सा. राहाणे यांनी सहा सदस्यीस चौकशी समिती नियुक्त केली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्याशी कोणतीही पूर्व चर्चा न करता ही समिती जि.प.मध्ये चौकशीसाठी आली होती. त्यामुळे समिती थेट चौकशी करण्यासाठी आलीच कशी? असा प्रश्न उपस्थित करून सीईओ चव्हाण यांनी चौकशीच्या पद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेष बाब म्हणजे धोंगे यांच्या तत्कालिन राजकीय कार्यमुक्ती प्रकरणामध्ये चौकशी समितीमधील सदस्य सचिव कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांचे नाव चर्चेत असताना त्यांची समितीमध्ये निवड केलीच कशी ? असा सवाल जि.प. वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांमध्ये दिरंगाई होत असल्याचे कारण पुढे करून गतवर्षी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता धोंगे यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले होते. या राजकीय कार्यमुक्तीवरून जिल्हा परिषदेच्या तत्कालिन अर्थसंकल्पीय सभेत सर्व सभागृह आक्रमक झाले होते. त्याची दखल घेऊन धोंगे यांचा कार्यमुक्ती आदेश स्थगित करू. तसेच त्यांची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करून चौकशी अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही तत्कालिन अध्यक्ष राहूल पाटील यांनी दिली होती. पण त्यानुसार कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे धोंगे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने पहिल्या टप्यात या आदेशाला स्थगिती दिली होती. तर सुमारे सहा महिन्यांपूर्वी धोंगे यांचा कार्यमुक्ती आदेश रद्दबातल ठरवला. त्यामुळे नेत्याची दिशाभूल करून धोंगेंची कार्यमुक्ती करून तेथे आपल्या सोईचा अधिकारी आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या जि.प.तील तत्कालिन कारभाऱ्यांना चपराक बसली होती.
भ्रष्टाचाराचे आरोप अन् चौकशी समितीची नियुक्ती
भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत भ्रष्टाचार झाला असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी सांगली मंडळाचे अधिक्षक अभियंता एस.बी. नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता धोंगे यांना कार्यमुक्त केल्यानंतर सुमारे तीन महिने ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे प्रभारी कार्यकारी अभियंता पदावर काम केलेले अमित पाथरवट हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. पाथरवट यांच्याकडे कार्यभार असताना त्यांनीही जलजीवन मिशनअंतर्गत अनेक योजनांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे समितीमध्ये पाथरवट यांची सदस्य सचिव म्हणून निवड केलीच कशी? असा प्रश्न जाणकारांतून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात १२०५ पाणीपुरवठा योजनांचा आराखडा
जिल्ह्यात १२०५ पाणीपुरवठा योजनांचा आराखडा तयार केला असून त्यापैकी १८० योजना पुर्ण झाल्या आहेत. तर उर्वरित योजनांची कामे सुरू आहेत. आराखड्यातील योजनांपैकी ४६४ योजना सोलरवर कार्यान्वित केल्या जाणार आहेत. तर ८१ योजना पूर्णपणे ग्राव्हीटीवर आहेत. तसेच सुरु असलेल्या कामांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत पर्यवेक्षण करण्यासाठी शासनाने ‘टीयुव्हीएसयुडी साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सर्व कामे गुणवत्तापूर्ण होणार असून त्यामध्ये भ्रष्टाचार होणार कसा? अशी विचारणा जि.प. वर्तुळातून उपस्थित केली जात आहे.