बेळगाव : रिंगरोडविरोधात शेतकरी तक्रारी नेंदवत आहेत. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही जमिनीचा सर्व्हे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी वाघवडे गावच्या 25 हून अधिक शेतकऱ्यांनी रिंगरोडला कदापिही जमीन देणार नाही, अशी तक्रार मांडली आहे. तालुक्यातील 32 गावांतील शेतकऱ्यांनी तक्रारी देण्यास सुरुवात केली आहे. जवळपास सर्वच गावांतील शेतकऱ्यांनी विरोध केला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता कोणती भूमिका घेणार, याकडे पहावे लागणार आहे. तालुक्यातील 32 गावांच्या जमिनी रिंगरोडसाठी घेण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. म. ए. समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून विरोध दर्शविण्यात आला आहे. तरीदेखील दडपशाही करून रिंगरोड करण्याचा प्रयत्न चालविण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी वाघवडे, बाची, उचगाव परिसरामध्ये सर्व्हे करण्यासाठी काही कर्मचारी गेले होते. त्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. मात्र दडपशाही करत हा रस्ता करण्याचा घाट घातल्याचे बोलले जात आहे.
शेतकऱ्यांनी रिंगरोडविरोधात तक्रारी दिल्या असतानाही अचानकपणे येऊन सर्व्हे करणे, असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर रस्त्यामध्ये सुपीक जमीन जाणार आहे. त्यामुळे शेतकरी भूमीहीन होणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. आतापर्यंत उचगाव, वाघवडे, संतिबस्तवाड, बाची, मंडोळी, बेळगुंदी, मुतगा, येळ्ळूर या परिसरातील शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत. सर्व शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी होत आहे. सोमवारी वाघवडे येथील शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी नोंदविल्या. शेतकऱ्यांच्यावतीने अॅड. एम. जी. पाटील आणि अॅड. प्रसाद सडेकर यांनी या तक्रारी दिल्या आहेत. यावेळी आर. के. पाटील, जोतिबा आंबोळकर, मोहन देसाई, युवराज पाटील, सोमनाथ परीट, कृष्णा दिवीटगे, कल्लाप्पा दिवीटगे, राजू दिवीटगे, रघुनाथ पाटील यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.