जिल्हाधिकारी-पोलीस उपायुक्तांच्या सहभागाचा सकारात्मक परिणाम
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा पोलीसप्रमुखांच्या 13 व्या फोन ईन कार्यक्रमाला शनिवारी बेळगाव जिल्हा व शहरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रथमच जिल्हाधिकारी व पोलीस उपायुक्तांनीही या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अनेक समस्या मार्गी लागण्यास हातभार लागला. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारीही भारावून गेले होते.
तब्बल 12 फोन ईन कार्यक्रम जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी एकट्याने राबविले आहेत. शनिवारी 10 जून रोजी प्रथमच जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांनीही भाग घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांसोबत मनपा, वेगवेगळ्या नगरपालिका, भूमापन विभाग आदी विविध शासकीय विभागाचे अधिकारीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. एखादी समस्या ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी तेथेच आपल्या अधिकाऱ्यांना सूचना करताना दिसत होते.
शनिवारी सकाळी 9 वाजता फोन ईन कार्यक्रमाला सुरुवात झाली. 11 पर्यंतची वेळ होती. 11 नंतरही फोन वाजतच होते. त्यामुळे आणखी दहा मिनिटे या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधला. जिल्ह्यातील पाणी समस्या, स्मशानांची समस्या, बेकायदा व्यवसाय, बेकायदा दारूविक्री, जमीनवाद, रस्त्यासाठीच्या तक्रारी, आर्थिक फसवणूक, खून प्रकरणे, अपहरण प्रकरणे आदी तक्रारी आल्या.
केवळ गुन्हेगारीविषयीच नव्हे तर गटारी स्वच्छ करणे, शेतकऱ्यांसाठी कृष्णेत महाराष्ट्रातून पाणी सोडणे, अशी मागणी करणारे फोन कॉलही आले. काहीजणांनी तर हागणदारीचा प्रश्न ठळकपणे मांडला. स्मशानभूमीच्या समस्याही अनेकांनी प्रकर्षाने मांडल्या. या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात यादगिरी जिल्ह्यातून एक तक्रार आली.
बेळगाव जिल्ह्यातून 51, बेळगाव शहर व तालुक्यातून 11, यादगिरी जिल्ह्यातून 1 अशा एकूण 63 तक्रारी आल्या. आतापर्यंत 790 जणांनी फोन ईन कार्यक्रमात आपले गाऱ्हाणे मांडल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले. काहीजणांनी चुकीची माहितीही दिली आहे. तशा व्यक्तींना बोलावून समज देण्यात येते. कारण हे व्यासपीठ सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्याचा दुरुपयोग होऊ नये, याची प्रत्येकाने खबरदारी घेण्याचे आवाहनही डॉ. संजीव पाटील यांनी केले.
फी वाढ, स्मशानभूमी, पाणी समस्या….
शिक्षण संस्थांमध्ये फी वाढ केल्यासंदर्भातही शनिवारी अनेक तक्रारी आल्या. अथणी येथील एका शिक्षण संस्थेविषयी तक्रार येताच ठोस तक्रार दिल्यास संबंधित संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. फोन ईन कार्यक्रमानंतर नितेश पाटील यांनी पोलीसप्रमुखांचे अभिनंदन केले. संपूर्ण राज्यात हा एक आदर्श उपक्रम ठरला आहे. म्हणून आपण स्वत: सहभागी झालो. यापुढील फोन ईनमध्येही आपण सहभागी होऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. स्मशानभूमीच्या समस्यांबद्दल बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, प्रत्येक गावात स्मशानभूमी आहे. वेगवेगळ्या समाजासाठी स्मशानभूमी मंजूर करण्याची तरतूद नाही. अनेकवेळा खासगी जागा खरेदी करूनही स्मशानासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आठवडाभरात पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. मात्र, एक-दोन दिवसात पाऊस येण्याची आशा त्यांनी बोलून दाखविली.