गुरुवारी विधानसभा अधिवेशनाच्या समारोपापूर्वीच आंदोलकांसाठी असलेले मंडप पडले ओस : आंदोलनांमुळे आले होते यात्रेचे स्वरूप
प्रतिनिधी / बेळगाव
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी आंदोलने छेडण्यात आली होती. आंदोलनांची दखल घेतली जाईल की नाही, याची शाश्वती नाही. मात्र शासनाच्या दारात येऊन विविध संघटनांनी आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले आहे. दि. 19 पासून कोंडुसकोप परिसरात छेडण्यात आलेल्या आंदोलनांमुळे यात्रेचे स्वरूप आले होते. मात्र गुरुवारी विधानसभा अधिवेशनाच्या समारोपापूर्वीच आंदोलकांसाठी असलेले मंडप ओस पडले होते.
प्रत्येक समाज आणि नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. समाजाच्या आणि नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र या समस्यांचे निवारण करण्याऐवजी आंदोलने करण्यास प्रशासन प्रोत्साहन देत असल्याचे हिवाळी अधिवेशनावेळी निदर्शनास आले. बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या प्रत्येक हिवाळी अधिवेशनावेळी सुवर्णसौध परिसरात विविध संघटनांच्यावतीने आंदोलने छेडली जातात. दररोज अनेक संघटनांनी आंदोलने छेडली. काही मोजक्याच संघटनांना यश मिळाले. पण बहुतांश संघटनांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही.
आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रत्येक अधिवेशनावेळी आंदोलन छेडली जातात. यंदाही आंदोलने छेडण्यात आली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटना आंदोलन छेडणार याची माहिती शासनाला असल्याने समस्यांचे निवारण करण्याऐवजी त्यांना आंदोलन करण्यासाठी कोंडुसकोप परिसरात मंडप उभारणी करून व्यवस्था उपलब्ध केल्या होत्या. कोंडुसकोप तसेच राष्ट्रीय महामार्गाशेजारी मोठमोठे मंडप उभारण्यात आले होते. त्याठिकाणी पाणी व अन्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तसेच शेकडो पोलीस आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती शासनाने केली होती. त्यामुळे आंदोलने करण्यासाठी जणू सरकारच प्रोत्साहन देत असल्याचे निदर्शनास आले.
दि. 19 रोजी अधिवेशनास प्रारंभ झाला. पहिल्या दिवसापासूनच मोठमोठ्या आंदोलनांना प्रारंभ झाला होता. दि. 20 पासून याठिकाणी दररोज 12 ते 14 संघटना आंदोलन छेडत होत्या. काही संघटनांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी 4 ते 5 दिवस आंदोलन छेडले होते. आतापर्यंत झालेल्या आंदोलनामध्ये पंचमसाली लिंगायत समाजाचे आंदोलन मोठे होते. या आंदोलनात दीड ते दोन लाख समाजबांधवांनी सहभाग घेऊन आरक्षणाची मागणी केली आहे. या आंदोलनात लाखो समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती मिळाल्याने आंदोलकांसाठी वेगळ्या ठिकाणी व्यवस्था केली होती.