प्रा. डॉ. अच्युत माने : निपाणीत हुतात्मा दिन गांभीर्याने : सीमाप्रश्नी रस्त्यावरच्या लढाईसाठी लोकसहभाग महत्त्वाचा
प्रतिनिधी /निपाणी
गेली सहा दशके कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न प्रलंबित आहे. तांत्रिकदृष्टय़ा तसेच संविधानिकदृष्टय़ा महाराष्ट्राची बाजू भक्कम आहे. अशावेळी न्यायालयीन लढाई सक्षमपणे लढली जात असून याप्रश्नी रस्त्यावरच्या लढाईसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. गेल्या दोन महिन्यांतील चित्र पाहिल्यास सीमाप्रश्न लवकरच सुटण्याची आशा आहे. महाराष्ट्रातील नेत्यांशी झालेल्या चर्चेनुसार पुढील महिन्यात कोल्हापुरात सीमाप्रश्नासंदर्भात गोलमेज परिषद भरविण्यात येणार आहे, अशी माहिती ज्ये÷ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी दिली.
निपाणीत मंगळवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पार पडला. प्रारंभी बेळगाव नाका येथे सीमालढय़ातील अग्रणी बॅरिस्टर नाथ पै यांना मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यानंतर साखरवाडी येथे हुतात्मा कमळाबाई मोहिते यांच्या प्रतिमेचे पूजन सीमालढय़ातील ज्ये÷ कार्यकर्ते बळीराम बराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थित मराठी भाषिकांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी ‘निपाणी, बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ’रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे’ यासह विविध घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे यांनी, सीमाप्रश्नाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी सीमाभागातून किमान एक हजार कार्यकर्त्यांसह दिल्लीला धडक देऊन तेथे आंदोलन करण्याची गरज व्यक्त केली. म. ए. समितीचे जयराम मिरजकर यांनी लोकशाही मार्गाने सर्वाधिक काळ चाललेला लढा म्हणून सीमाप्रश्नाची ओळख असून सीमाप्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाल्याचे सांगितले.
याप्रसंगी निपाणी टाऊन प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष अभय मानवी, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष शाह, प्रा. डॉ. भारत पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, उद्योजक रोहन साळवे, प्रशांत गुंडे, निधर्मी जनता दलाचे ब्लॉक अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर, प्रशांत नाईक, दीपक वळीवडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. एन. आय. खोत, माजी नगरसेवक धनाजी निर्मळे, झुंजार दबडे, नंदकिशोर कांबळे, रमेश भोईटे, सुनील हिरुगडे, आनंदा रणदिवे, अजित पाटील, उदय शिंदे, धनाजी क्षीरसागर, रामचंद्र चव्हाण, सत्यजित साळवे यांच्यासह मराठी भाषिक उपस्थित होते.
बंदला चांगला प्रतिसाद
हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी निपाणीत कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दुपारी 12 वाजेपर्यंत साखरवाडी, बेळगाव नाका, नरवीर तानाजी चौक, चाटे मार्केट परिसरात व्यावसायिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून सीमालढय़ातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.