चर्चेच्या मागणीवरून लोकसभेत गदारोळ ः राज्यसभेत 17 विरोधी पक्षांचा सभात्याग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि चिनी सैनिकांमध्ये तवांग येथे झालेल्या झटापटीचा मुद्दा बुधवारी पुन्हा एकदा विरोधी पक्षांनी संसदेत उपस्थित केला. तवांग मुद्दय़ावरील चर्चेसाठी लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. तसेच चर्चेच्या मागणीसाठी 17 विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला. यामध्ये काँग्रेस, आरजेडी, आम आदमी पार्टी, एमडीएमके, सीपीआय, संजद, द्रमुक, टीएमसी आणि टीडीपीसह इतर विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले होते.
भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षावर काँग्रेसने विरोधी पक्षांची उच्चस्तरीय बैठकही बोलावली होती. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी तवांग मुद्दय़ावरून सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांशी चर्चा केली. त्यानुसार सभागृहात विरोधी पक्षांची एकजूट दिसून आली. खर्गे यांच्यासह अन्य विरोधी पक्षनेत्यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपसभापती हरिवंश यांनी शून्य प्रहरच्यावेळी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. मात्र विरोधकांनी भारत-चीन संघर्ष हा गंभीर मुद्दा असल्याने त्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. ही चर्चा करण्याची विरोधकांची मागणी सभापतींनी मान्य न केल्याने 17 विरोधी पक्षांनी सभागृहातून सभात्याग केला.
विरोधकांचे सरकारवर आरोप
काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी सरकार तवांगमधील संघर्षाच्या विषयावर चर्चा करत नसल्याचा आरोप संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. सर्व 17 पक्ष सैनिकांच्या पाठीशी उभे आहेत, आम्ही सर्वजण या विषयाबद्दल चिंतित आहोत. सीमेवरील संघर्षाच्या मुद्दय़ावर तडजोड होऊ शकत नाही. राष्ट्रीय सुरक्षा ही प्रमुख चिंता आहे, असे ते म्हणाले.
एलएसीवरील भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर सरकार चर्चा करण्यास का तयार नाही, हे आम्हाला कळत नाही? असे माकपचे खासदार जॉन ब्रिटास म्हणाले. तर जेडीयुने ‘आम्ही एलएसीवरील चीनच्या आक्रमकतेवर चर्चा करण्यास सांगितले. सरकार सीमा संघर्षावर चर्चा करण्यास तयार नसल्याने हा सभागृहाचा अपमान असल्याचे भाकपने म्हटले आहे.
या विषयावर चर्चा करण्यासाठी खासदारांनी शून्य प्रहर तहकूब करण्याची मागणी केली. त्यासाठी अशा आक्रमकतेला तोंड देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. पूर्व लडाखमध्ये 30 महिन्यांहून अधिक काळ दोन्ही बाजूंमधील सीमेवरील तणावाच्या दरम्यान गेल्या शुक्रवारी संवेदनशील भागात एलएसीजवळील यांगत्सेजवळ झटापट झाली होती.
यापूर्वी मंगळवारी संसदेमध्ये भारत-चीन संघर्षावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर दिले होते. त्यांच्या या स्पष्टीकरणावर विरोधकांचे समाधान झालेले नाही. संरक्षणमंत्री संसदेत आले आणि त्यांचे वक्तव्य वाचून बाहेर गेले. ते चर्चा करायलाही तयार नव्हते. तसेच राजीव गांधी फाउंडेशन प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे खर्गे यांनी स्पष्ट केले होते. विरोधकांना बोलण्याची संधी दिली जाईल, असे उपसभापतींनी सांगितले होते. मात्र त्यांनी तसे केले नाही, असे खर्गे यांनी सांगितले. विरोधकांची बाजू सत्ताधारी पक्षाने जाणून न घेणे देशासाठी घातक असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
तवांगमध्ये 600 चिनी सैनिकांशी झटापट
9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील यांगत्से येथील भारतीय चौकी हटवण्यासाठी 600 चिनी सैनिक घुसखोरीचा प्रयत्न करत होते. भारतीय जवानांनी मागे हटवल्यावर दोन्ही सैन्यात झटापट झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. भारताच्या 6 जखमी जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले. तर चिनी सैनिकांना आपल्यापेक्षा जास्त नुकसान सोसावे लागले. चीनचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत.
भाजप संसदीय मंडळ बैठकीत टाळय़ांच्या गजरात मोदींचे स्वागत
हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवारचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक घेतली. जेव्हा पंतप्रधान मोदी दाखल झाले तेव्हा संसदीय मंडळाच्या सदस्यांनी टाळय़ा वाजवून त्यांचे स्वागत केले. गुजरातमधील विजयासाठी हे स्वागत करण्यात आले. सुमारे 3 मिनिटे टाळय़ा वाजत राहिल्या.