विरोधी पक्षनेत्यांसह काँग्रेसचे आठ आमदार भाजपात ः विधानसभेत भाजपचे झाले 28 आमदार
प्रतिनिधी / पणजी
अखेर काँग्रेस पक्षात बुधवारी अधिकृतपणे फूट पडली आणि 11 आमदारांपैकी विरोधी पक्षनेते मायकल लोबो तसेच माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली केदार नाईक, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर या आमदारांनी काँग्रेसपासून वेगळे होण्याचा निर्णय पर्वरी येथील विरोधी पक्षनेत्यांच्या कॅबिनमध्ये सकाळी झालेल्या बैठकीत घेतला. त्यानंतर लगेच सर्वांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली. विधिमंडळ सचिवालयात जाऊन सर्वांच्या स्वाक्षरीचे पत्र विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन यांना दिले. पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदीनुसार या गटाचे संख्याबळ दोन तृतीयांश असल्याने सभापती रमेश तवडकर यांनी मान्यता दिली. दुपारी सर्वांना प्रदेश भाजप मुख्यालयात अध्यक्ष सदानंद तानावडे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांचे स्वागत केले. पितृपक्ष असतानाच या आठही जणांनी नवरात्रोत्सवापूर्वीच सीमोल्लंघन केले.
काँग्रेस आमदारांच्या या प्रवेशामुळे भाजप सरकारचे संख्याबळ आता 33 वर पोहोचले आहे. त्यात भाजपचे स्वतःचे 20 आणि नव्याने आलेले आठ मिळून एकूण 28, तसेच मगोचे दोन आणि तीन अपक्षांचा समावेश आहे.
काँग्रेसकडे राहिले केवळ तीन आमदार
काँग्रेसकडे ऍल्टन डिकॉस्टा, युरी आलेमाव आणि कार्लोस फेरेरा हे केवळ तिघेच आमदार शिल्लक राहिले आहेत. उर्वरितांमध्ये ’आप’ चे दोन, आणि गोवा फॉरवर्ड व आरजी यांच्या प्रत्येकी एका आमदाराचा विरोधकांत समावेश आहे.
अफवा नव्हे, सत्त्य बातम्यांवर शिक्कामोर्तब
गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून काँग्रेसचे आमदार फुटण्यावरून वारंवार बातम्या पसरविल्या जात होत्या. मात्र इच्छित संख्याबळ पूर्ण होण्यात येणाऱया अडथळ्यांमुळे आतापर्यंत ते लांबणीवर पडत होते. परंतु बाहेर बोलताना काँग्रेसचे नेते त्या अफवाच असल्याचे सांगत आले होते. यात वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तसेच आठ वेळचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याबद्दल सर्वाधिक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अनेकदा त्यांचे दिल्लीला जाणेसुद्धा चर्चेचा विषय बनत होते. परंतु प्रत्येकवेळी त्या खोटय़ा असल्याचे, तसेच आपण वैयक्तिक कामासाठी जात होतो, असे सांगून ते वेळ मारून नेत होते. बुधवारी त्यांच्यासह आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावरून आतापर्यंतच्या बातम्या या अफवा नव्हे तर सत्य होत्या यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजपा मुख्यालयात सर्वांचे झाले स्वागत
आठही आमदारांना प्रवेश देण्यासाठी भाजपच्या पणजी मुख्यालयात आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, प्रवक्ते दामू नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनी प्रत्येक आमदाराला रितसर प्रवेश पावती व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.
मोदी, सावंतांचे हात बळकट करण्यासाठीच पुन्हा भाजपात ः लोबो
मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले.
हे तर निर्लज्ज स्वार्थाचे प्रदर्शन ः सरदेसाई
काँग्रेस आमदारांच्या या कृत्याचा गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी कठोर शब्दात निषेध केला आहे. राजकीय नीतिमत्ता गामावलेल्या या लोकप्रतिनिधींनी केवळ पैसा आणि सत्तेसाठी स्वतःचा सौदा केला आहे. निर्लज्ज स्वार्थाचे प्रदर्शन मांडणाऱया या लोकप्रतिनिधींना देवासमोर घेतलेल्या शपथेचासुद्धा विसर पडला, असे जोरदार शब्दप्रहार सरदेसाई यांनी केले आहेत.
लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू ः मुख्यमंत्री
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, गोव्यातून ’काँग्रेस छोडो’ यात्रा सुरू झाली आहे. तसेच आमचे ’मिशन कमळ 2.0’ यशस्वी झाले आहे. काँग्रेस आमदारांच्या प्रवेशामुळे भाजपचे संख्याबळ वाढले असून या बळावर आम्ही लोकसभेच्या दोन्ही जागा निर्विवाद जिंकणार आहोत.
चारशे जागा जिंकून पुन्हा मोदीच पंतप्रधान
तसेच 2024 मध्ये होणाऱया निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा जिंकून नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान बनतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या उर्वरित तीन आमदारांसाठीही भाजपची दारे खुली आहेत. मात्र ते त्यांच्या इच्छेवर अवलंबून असेल, आम्ही कुणावरही सक्ती करणार नाहीत, असे ते म्हणाले. अन्य एका प्रश्नावर बोलताना त्यांनी सध्यातरी विद्यमान मंत्रिमंडळात कोणतेही फेरबदल करण्यात येणार नाहीत, असे स्पष्ट केले.
भाजपवासी झालेले आमदार
दिगंबर कामत
मायकल लोबो
डिलायला लोबो
केदार नाईक
रुडॉल्फ फर्नांडीस
आलेक्स सिक्वेरा
राजेश फळदेसाई
संकल्प आमोणकर
विरोधी पक्षनेत्याने भाजपात प्रवेश करण्याची तिसरी घटना
विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. अशाप्रकारे विरोधी पक्षनेत्यासह काँग्रेस आमदारांचा गट भाजपात विलीन होण्याची ही तिसरी वेळ आहे. तत्पूर्वी 2000 साली काँग्रेस नेते, तथा विरोधी पक्षनेते रवी नाईक यांनीही आठ आमदारांसह भाजपात प्रवेश केला होता. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारात नाईक उपमुख्यमंत्रंाr बनले होते. त्यानंतर 2019 मध्ये विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर कवळेकरांना उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले होते. त्यानंतर आता मायकल लोबो यांचा क्रमांक लागला.
विरोधी पक्षेनेतेपद धोक्यात
राज्य विधानसभेत आता विरोधकांची संख्या अत्यल्प ठरली आहे. केवळ 7 आमदार हे विरोधी पक्षात राहिले आहेत. काँग्रेसची अवस्था ही एखाद्या प्रादेशिक पक्षापेक्षाही वाईट बनली आहे. विरोधी पक्षेनेता बनण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाकडे किमान 5 ते 7 आमदार आवश्यक असतात. काँग्रेसकडे आता केवळ 3 आमदार शिल्लक राहिलेत. एखादा कमी संख्येच्या राजकीय पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देता येणे शक्य नाही. कायद्यात ते बसणारे नाही. त्यामुळे आता राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद असणार नाही. विजय सरदेसाई वगळता विरोधी पक्षात सर्वच नवे चेहरे आहेत.
देवानेच आशीर्वाद दिल्याने काँग्रेस सोडला ः कामत
दिगंबर कामत यांनी आपल्या भाजप प्रवेशाचे समर्थन करताना, ’आम्ही काँग्रेस सोडणार नाहीत अशी देवासमोर शपथ घेतली होती हे खरे असले तरी नंतरच्या काळात परिस्थितीत अनेक बदल झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद देताना ज्येष्ठतेचा विचार झाला नाही. त्यामुळे मनात नाराजीची भावना निर्माण झाली. अशा परिस्थितीत पक्षात राहणे योग्य होणार नाही, याची खात्री पटल्यामुळे पुन्हा देवासमोर गेलो. त्याला परिस्थितीची जाणीव दिली. तेव्हा देवानेच, तुला योग्य वाटेल तो निर्णय घे, आपला आशीर्वाद असेल, असे सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांशीही सल्लामसलत केली व भाजपात रुजू होण्याच्या निर्णयाप्रत आलो, असे कामत यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची भरभराट होत आहे. जागतिक पातळीवर देशाचे नाव आदराने घेतले जात आहे. आज जगभरात असलेल्या भारतीयांना तेथील लोकांकडून आदर सन्मान मिळू लागला आहे, असे कामत म्हणाले. आज काँग्रेसला ’भारत जोडो’ ची नव्हे तर ’पक्ष जोडो’ ची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.