काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांच्याकडून एलईडी स्क्रिन रथाचे कौतूक : ‘भारत जोडो’ यात्रेत आमदार सतेज पाटील यांचा राहूल गांधी यांच्याशी संवाद
प्रतिनिधी/कोल्हापूर
महाराष्ट्रातील ‘भारत जोडो’ यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील हे काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झाले. राहूल गांधी यांच्यासोबत चालताना आमदार पाटील यांनी ‘एलईडी क्रिन रथ’ उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. ‘भारत जोडो’ यात्रा कोल्हापूर जिल्ह्याच्या गावागावापर्यंत पोहचविण्याच्या या उपक्रमाचे राहूल गांधी यांनी कौतुक केले.
खासदार राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे महाराष्ट्रात दाखल झाली. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील खतगाव फाटा ते शंकरनगर रामतीर्थ या मार्गामध्ये आमदार सतेज पाटील यांनी राहूल गांधींशी चर्चा केली. 13 एलईडी क्रिन रथाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील 1239 गावे आणि कोल्हापूर तसेच इचलकरंजी शहर व 13 नगरपालिका या ठिकाणी 100 दिवस भारत जोडो यात्रा लाईव्ह दाखविण्याचा भारतातील पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी यांच्यापर्यंत ‘भारत जोडो’ यात्रा पोहचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच 100 दिवस हे एलईडी क्रिन रथ कशा प्रकारे गावागावात पोहचणार आहेत यांचीही सविस्तर माहिती दिली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे खासदार राहूल गांधी यांनी कौतुक करत आमदार पाटील यांच्याशी हस्तांदोलन केले.