ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात पोहोचली असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात पत्र पाठवत राहुल गांधींना धमकी देण्यात आली आहे. यापत्रामध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवू असं धमकावण्यात आलं आहे. पोलीस आणि क्राइम ब्रांच हे निनावी पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे. (Congress Leader Rahul Gandhi Received A Death Threat)
भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी इंदूरमध्ये येणार आहेत. परंतु राहुल गांधी इंदूरमध्ये दाखल होण्याआधीच त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात धमकीचे एक निनावी पत्र सापडले आहे. त्या पत्रातून राहुल गांधींना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जुनी इंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र मिळाले आहे. सध्या पोलीस दुकानाबाहेरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पत्र ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जुनी इंदूरच्या भागात असलेल्या एका मिठाईच्या दुकानात अज्ञात व्यक्तीने पत्र ठेवले होते. हा प्रकार दुकानमालकाने पाहिल्यानंतर त्याने हे पत्र पोलिसांच्या हवाली केले. या पत्रात राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान इंदूरच्या खालसा कॉलेजमध्ये थांबल्यास त्यांना बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्याची धमकी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून धमकीचं पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे. राहुल गांधी सध्या महाराष्ट्रात असून २४ नोव्हेंबरला इंदोरमध्ये असणार आहेत. खालसा स्टेडिअममध्ये ते रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहेत.