वृत्तसंस्था/ लखनौ
काँग्रेस पक्ष सातत्याने असंतुष्ट नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही नेत्यांची नाराजी सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेते राज बब्बर यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. बब्बर यांनी मोदी सरकारची तुलना मनमोहन सिंह यांच्या सरकारसोबत करत हे कौतुक केले आाहे.
राज बब्बर यांनी मोदी सरकारच्या ‘पंतप्रधान जनधन योजने’चे कौतुक करणारा ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मोदी सरकारची मनमोहन सरकारसोबत तुलना केली आहे. ‘पीएम जनधन योजने’ने 8 वर्षे पूर्ण केली आहेत. लोकांपर्यंत मदत आणि पैसा कुणाच्याही हस्तक्षेपाशिवाय पोहोचत असून ही क्रांतीच असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. जनधन योजनेतील निम्म्याहून अधिक खातेधारक महिला आहेत. अशाच प्रकारची ‘आपका पैसा आपके हाथ’ या नावाने मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळात सुरू झाली होती. परंतु मोदी सरकारने निश्चितपणे उजवी कामगिरी केली असल्याचे राज बब्बर म्हणाले.