काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांना मिळाले दहा हत्तींचे बळ; आगामी निवडणूकांसाठी काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला; जिह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष; महाविकास आघाडीमध्ये चैतन्याचे वातावरण
कोल्हापूर कृष्णात चौगले
Congress : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवून एकतर्फी विजय संपादन केला. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसला ‘बुस्ट्’ मिळाला असून नेत्यांसह कार्यकर्त्यांना दहा हत्तींचे बळ मिळाले आहे. कर्नाटकातील या निकालामुळे भाजपच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ च्या अजेंड्याला तडा गेला असून ‘काँग्रेसयुक्त कर्नाटक’ असा कानडी जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला असून भाजप-शिंदे गटाने मात्र धास्ती घेतली आहे.
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी संपूर्ण देशभरात ‘भारत जोडो, नफरत छोडो’ यात्रा काढली. सर्वच राज्यांमध्ये त्यांच्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण तत्कालिन परिस्थितीत भविष्यातील निवडणूकांमध्ये या जन प्रतिसादाचे मतांमध्ये कितपत परिवर्तन होइल याबाबतचा अंदाज व्यक्त करणे राजकीय विश्लेषकांना देखील शक्य नव्हते. अखेर कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या निकालातून मात्र तेथील जनकौल स्पष्ट झाला आहे. हा निकाल एक राज्यापुरता मर्यादीत असला तरी संपूर्ण देशातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. तसेच आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेसच्या गोटात नवचैतन्य निर्माण झाले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजकीय संदर्भ आणि ताकद यामध्ये भिन्नता असली तरी राज्यातील भविष्यातील सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस मोठ्या ताकदीने मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर जिह्यातील चित्र पाहता काँग्रेस सर्वाधिक ताकद असलेला पक्ष आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आजमावले जाणार स्वबळ
आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून वैयक्तीक ताकद आजवमावण्याच्या हालचाली सुऊ आहेत. या निवडणूका स्वबळावर ताकदीने लढवल्यास पक्षाला त्याचा निश्चितपणे फायदा होणार असल्याचे प्रदेश पातळीवरील नेत्यांचे मत आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी असली तरी शक्य तेथे आघाडी न करता वैयक्तिक ताकदीचा अंदाज घेतला जाणार आहे. आघाडी केल्यास पक्षीय ताकद कमी होऊ शकते. तसेच निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारीही मिळू शकणार नाही. त्यामुळे ‘एकला चलो रे’ साठी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली सुऊ आहेत.
जिह्यात स्वबळ आजमावण्यासाठी पोषक स्थिती
जिह्यात काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा आमदार सतेज पाटील यांच्याकडे गेल्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक ताकद मिळाली. गटा-तटाचे राजकारण न करता काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी जिह्यात काम सुऊ केले. जिह्यात सर्वाधिक सहा आमदार असल्यामुळे काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रदेशच्या सुचनेनुसार जिल्हा काँग्रेसने स्वबळ आजमावल्यास पक्षाला निश्चितपणे फायदा होण्याची शक्यता आहे.
जिल्हाध्यक्षांचे सुक्ष्म नियोजन ठरणार फायद्याचे
जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी जिह्यातील सर्व तालुका कमिट्या रिचार्ज केल्या आहेत. त्यांना जबाबदारीची जाणिव करून देत त्या-त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी व प्रश्नांची निर्गत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे प्रश्न तालुका पातळीवर सुटत नाहीत, ते आपल्याकडे घेऊन येण्यास त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे तालुका कमिट्यांना उर्जितावस्था प्राप्त झाली असून त्याचा पक्षबांधणीसाठी मोठा फायदा झाला आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जिह्यात काँग्रेसचे एक हजारांहून अधिक ग्रामपंचायत सदस्य झाले आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांमध्ये काँग्रेसला याचा फायदा होणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये नर्वचैतन्य
कर्नाटकातील निकालामुळे महाविकास आघाडीला नवचैतन्य मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांत आघाडीतील काही घटक पक्षांच्या नेत्यांचे तळ्यात मळ्यात सुरु होते. त्याला या निकालामुळे पायबंद बसला आहे. या निकालाची परिसीमा केवळ काँग्रेसपुरती मर्यादित नसून आघाडीतील सर्वच घटक पक्ष उजळून निघाले आहेत. आगामी निवडणुकांना ताकदीने सामोरे जाण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.