पाच महिन्यात 12 राज्यांमधून प्रवास ः 150 दिवसांत 3,500 किमी अंतर कापणार
कन्याकुमारी / वृत्तसंस्था
काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षी ‘भारत जोडो यात्रे’ला बुधवारी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून प्रारंभ झाला. याप्रसंगी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांच्याकडे प्रतिकात्मक राष्ट्रध्वज सुपूर्द केला. या यात्रेत राहुल गांधींसोबत काँग्रेसचे अनेक ज्ये÷ नेते सहभागी झाले आहेत. यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हुतात्मा स्मारकावर पोहोचून त्यांना आदरांजली वाहिली. या भेटीदरम्यान राहुल गांधी यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित होते. या यात्रेतील साडेतीन हजार किमी लांबीचा प्रवास आगामी पाच महिन्यांत 12 राज्यांमधून केला जाणार आहे.
नियोजनानुसार ‘भारत जोडो’ ही पदयात्रा दोन सत्रात चालणार आहे. पहिल्या टप्प्यात एका दिवसात 22 ते 23 किमी अंतर कापण्याची योजना आहे. या यात्रेत विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे 117 नेते सहभागी होणार आहेत. तसेच ठिकठिकाणचे शेकडो काँग्रेस कार्यकर्तेही तेथे मोर्चामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतील.
या प्रवासासाठी 60 विशेष कंटेनर (वाहने) तयार करण्यात आली आहेत. या 150 दिवसांच्या प्रवासात राहुल गांधीही या कंटेनरमध्येच वास्तव्य करणार आहेत. काही कंटेनरमध्ये एअर कंडिशनरही बसवण्यात आले आहेत. यात्रेत सहभागी होणाऱयांना स्थानिक पातळीवरून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील लोकच जेवण बनवतील, असे सांगण्यात आले.
…हा ‘कुटुंब’ वाचवण्याचा प्रवास ः भाजप
भारतीय जनता पक्षाने (भाजप) बुधवारी काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला ‘फसवणूक’ असे संबोधत ही प्रामुख्याने देशातील सर्वात जुन्या पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘कुटुंब वाचवण्याची मोहीम’ असल्याची टिपण्णी केली आहे. भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा हा आणखी एक प्रयत्न असल्याचा दावा पत्रकारांशी बोलताना केला.
देशाला जोडण्यासाठी यात्रा ः काँग्रेस
7 सप्टेंबर 2022 रोजी म्हणजेच आजपासून कन्याकुमारी येथून काँग्रेसचा ’भारत जोडो’ प्रवास सुरू झाला आहे. 12 राज्यांतून सुमारे 3,500 किमी अंतर कापत या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. भारत जोडो यात्रेत दररोज 25 किमीचा पायी प्रवास असेल आणि 3500 किमीचा प्रवास 150 दिवसांत पूर्ण केला जाईल. यादरम्यान अनेक ठिकाणी चौकसभा आणि सर्वसाधारण सभांचे आयोजनही केले जाणार आहे. देशाला जोडण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. जेव्हा ही यात्रा निघेल तेव्हा इतिहास लिहिला जाईल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
2024 ची पूर्वतयारी?
दरम्यान, काँग्रेसची भारत जोडो यात्रा म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरुद्ध वातावरण निर्माण करण्याची तयारी असल्याचे बोलले जात आहे. या यात्रेनिमित्त काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत करणे आणि देशभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा भरणे, तसेच पक्षात आणखी तरुण कार्यकर्त्यांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न असल्याचेही सांगितले जात आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून ही काँग्रेस पुढे करत असल्याची चर्चा आहे.