मंगळवारी रात्रीपासून विद्युतपंप सुरू : कपिलेश्वर तलावाच्या कठडय़ांची उंची वाढविण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी कपिलेश्वर तलावामध्ये मिसळल्याने गणपती विसर्जनास अडथळा निर्माण झाला होता. तलावातील पाणी दूषित झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे तलावातील पाणी उपसा करण्यात येत असून मंगळवारी रात्रीपासून विद्युतपंप सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे दूषित पाणी काढून विसर्जनाकरिता सज्ज करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत.
कपिलेश्वर रोडवरील पावसाचे पाणी येथील तलावामध्ये मिसळत आहे. यापूर्वीदेखील पावसाचे पाणी तलावामध्ये जात होते. उड्डाणपुलाचे काम करण्यात आल्यानंतर गटारीचे बांधकाम झाले नव्हते. त्यामुळे पावसाचे पाणी तलावात जात असल्याचे सांगण्यात आले. पण गटारीचे बांधकाम केल्यानंतरही पावसाचे पाणी मंगळवारी रात्री तलावामध्ये शिरले. गणेशोत्सव सुरू असल्याने श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. मंगळवारी सातव्या दिवशी काही भाविक श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी तलावाकडे गेले असता पावसामुळे सांडपाणी तलावात मिसळून संपूर्ण तलाव दूषित पाण्याने भरल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तलावात विसर्जन करण्यास टाळून रामेश्वरतीर्थ (जक्कीनहोंडा) तलावात विसर्जन करण्यासाठी गेले. पण कपिलेश्वर तलावात सांडपाणी सातत्याने मिसळत असून गटारीचे बांधकाम करूनही या समस्येचे निवारण झाले नाही. त्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
परिसरातील गटारीचे बांधकाम झाले. पण याठिकाणी असलेल्या सीडीचे बांधकाम करण्यात आले नाही. सीडी अरुंद असल्याने पावसाचा जोर वाढल्यानंतर पाण्याचा निचरा होत नाही. तसेच काही ठिकाणी गटारी, ड्रेनेजवाहिन्या तुंबल्याने हे सांडपाणी रस्त्यावरून वाहते. अशातच येथील जुन्या तलावाशेजारील कठडा उंच नसल्याने रस्त्यावरील पावसाचे पाणी थेट तलावात शिरते. हे पाणी तलावात मिसळू नये, याकरिता आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे होते. पण मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यापुढे तरी तलावाच्या कठडय़ांची उंची वाढवून सांडपाणी जावू नये, याची दखल घेण्यात येईल का? असा मुद्दा उपस्थित होत आहे.
तलाव स्वच्छ करून विसर्जनासाठी सज्ज करणार
तलावातील पाणी दूषित झाल्याने मंगळवारी रात्रीपासून विद्युतपंपाद्वारे पाणी उपसा करण्यात येत आहे. बुधवारी दुपारपर्यंत निम्मा तलाव रिकामी झाला होता. रात्रीपर्यंत संपूर्ण पाणी काढून स्वच्छ करण्यात येईल, अशी माहिती मनपाच्या अधिकाऱयांनी दिली. विसर्जनावेळी विशेषतः घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लहान मूर्तींचे विसर्जन या ठिकाणी केले जाते. शुक्रवारी विसर्जन असल्याने यापूर्वी हा तलाव स्वच्छ करून विसर्जनासाठी सज्ज करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी दिली.