नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘भारत जोडो’ पदयात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विवाद उभा केला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना ‘जय श्रीराम’ या घोषणेऐवजी ‘जय सियाराम’ ही घोषणा देण्याचा सल्ला आपल्या एका भाषणामध्ये दिला आहे. त्यावर भाजपने पलटवार केला असून राहुल गांधी हे ‘ निवडणूककाळापुरते हिंदू’ असल्याचा टोमणा लगावला आहे.
मध्यप्रदेशातील आगर-माळवा येथे बोलताना गांधी यांनी हे विधान केले. त्यांनी जय श्रीराम, जय सियाराम आणि हे राम या उद्गारांचे त्यांच्या पद्धतीने विश्लेषण केले. जय सियाराम म्हणताना सीतेचाही सन्मान होतो. पण भाजपचे लोक सीतेचे नाव घेत नाहीत. ते जय श्रीराम म्हणतात. त्यामुळे सीतेचा अपमान होत आहे. म्हणून भाजपने आपली घोषणा सुधारावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
हे राम म्हणजे काय
गांधीजीही जय सियाराम म्हणत नव्हते. तर ते हे राम म्हणाले होते. त्याचा अर्थ राम ही जीवन जगण्याची एक पद्धती आहे असा होतो. भगवान राम केवळ एक व्यक्ती नव्हते. तर ते एक जीवनपद्धती होते. गांधीजी हे राम म्हणत होते. त्याचा अर्थ असा होता की जे भगवान राम आहेत, तीच भावना आमच्या अंतःकरणात आहे. याच भावनेवर आम्हाला आमचे जीवन जगायचे आहे. भगवान राम आमचा श्वास आहेत, असे गांधींना म्हणायचे होते, असे राहुल गांधीचे म्हणणे आहे.
भाजपचा पलटवार
भगवान रामाचा आदर कसा करायचा हे काँगेसने आम्हाला शिकवू नये. भगवान राम अस्तित्वातच नव्हते, असे प्रतिज्ञापत्र काँगेस सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते. अशी काँगेस आज आम्हाला काय म्हणावे ते शिकवत आहे हे मोठा विनोद आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केली आहे. राहुल गांधींना आम्ही निदान जय सियाराम असे बोलण्यास भाग पाडले आहे, हा आमचा मोठा नैतिक विजय आहे, अशीही खोचक टिप्पणी त्यांनी केली. भाजपच्या प्रवक्त्यांनीही राहुल गांधी हे दांभिक आणि निवडणुकीपुरते हिंदू असल्याची टीका केली आहे.