कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकाने कोटय़वधी चीनी नागरीकांना ग्रासले आहे. चीनी लसही प्रभावहीन ठरत आहे. त्यामुळे आता अनेक चीनी लोक भारतीय योगविद्येकडे वळत आहेत. यावेळचा कोरोना एवढा भयानक आहे की, चीनी बालकेही आजारी पडत आहेत. त्यामुळे साऱया देशात एकच हाहाकार उडाला असल्याचे तेथील अनेक विद्यापीठांच्या प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
परिणामी आता चीनमधील असंख्य लोक पुरातन भारतीय योगविद्या, आयुर्वेद आणि ध्यानधारणेचे प्रशिक्षण घेत आहेत. स्वतः योगासने करतानाचे व्हिडीओ प्रसारित करुन इतरांनाही तसे करण्यासाठी प्रवृत्त आणि प्रोत्साहित करीत आहेत. योगव्यायामाच्या पद्धती आणि आसनांचे प्रकार यांची देवाणघेवाण होत आहे. कोमट पाणी नाकाने पिण्याची कला आत्मसात करीत आहेत. याला योगशास्त्राच्या भाषेत ‘जलनेती’ म्हणतात. जलनेतीचा उपयोग श्वसनमार्ग स्वच्छ करण्यासाठी, तसेच तीव्र सर्दी, श्वासोश्वासाच्या समस्या आणि दमा आदी विकार बरे करण्यासाठी केला जातो. तसेच भारतातील औषधानांही तेथे मोठी मागणी आहे.
आयुर्वेदिक औषधांच्या मागणीत आणि किमतीतही मोठी वाढ चीनमध्ये दिसून येत आहे. वनस्पतींपासून तयार पेलेली भारतीय औषधेच केवळ नव्हे, तर भारतात तयार झालेली विदेशी औषधेही चीनी नागरीकांना हवी आहेत. ही औषधे चीनमध्ये तयार होणाऱया औषधांपेक्षा 75 टक्के स्वस्त असल्याने सर्वसामान्य चीनी जनतेचा त्यांच्याकडे ओढा वाढला आहे. ही औषधे तेथे त्वरित मिळत नाहीत. त्यांसाठी अनेक दिवस आधी ऑनलाईन बुकींग करावे लागते. तेही करण्याची चीनींची तयारी आहे. भारतातून चीनला माल जाण्यासाठी कित्येकदा महिनाभर लागतो. पण वाट पाहण्याची त्यांची तयारी आहे. कोरोनाने त्यांना इतक्या पातळीपर्यंत सतावले आहे की हे सर्व उपाय केल्याशिवाय आता गत्यंतर राहिलेले नाही. योगशास्त्राला पर्याय नाही, हेच जणू चीनने सिद्ध केले आहे. अर्थात, हे सर्व उपाय प्रत्येकाने केवळ वृत्तपत्रातील आशय पाहून करावयाचे नसतात. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्लाच घ्यावा लागतो, हे भारतातही प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे.