अनेक अर्थाने ऐतिहासिक असणाऱया उदगीर नगरीत यंदाचे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य, कला, शिल्प, नृत्य, संगीत अशा बहुविध सृजनवंतांची मांदियाळी यानिमित्ताने एकत्र येणार आहे. वाचक आणि साहित्यिकांच्या प्रत्यक्ष भेटीचा हा सोहळा असतो. उदगीर साहित्य संमेलनातील कार्यक्रम, परिसंवादाचे विषय अत्यंत कल्पकतेने निवडल्याचे आढळते. संमेलन स्थळाचे भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी असे औचित्यपूर्ण नामाभिधान करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हे संमेलन होत आहे. या 75 वर्षांमध्ये आपण प्रगतीच्या दिशेने किती आणि कशी मजल मारली, याचे मूलगामी चिंतन यावेळी होणार आहे. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्यासारख्या प्रगल्भ, चिंतकाच्या अध्यक्षतेखाली हे विचारमंथन होत आहे. शेतकरी, महिला, पर्यावरण, प्रसारमाध्यमे, अध्यात्म आणि भाषिक अस्मितांचा उहापोह विविध परिसंवादातून होत आहे. सीमाभागात अडकलेल्या मराठी समाजाला भारत सरकार आणखी किती दिवस कुजवणार, असा जळजळीत सवाल करणारा परिसंवादही आखण्यात आला आहे. कोटय़वधी रूपयांची उधळपट्टी करून साहित्याचा उत्सव करणे योग्य आहे का, अशी टीका संमेलनावर होते. इतकेच नव्हे तर राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप, त्यांचा व्यासपीठावरील वावर अनाठायी असल्याची चर्चा दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण, दुर्गा भागवतांच्या काळापासून होत आहे. यशवंतरावांनी आपण साहित्य रसिक म्हणून संमेलनाला उपस्थित आहोत, असे सांगून त्यावेळी सगळय़ांची मने जिंकली होती. तथापि, भव्यदिव्य संमेलनाच्या आयोजनासाठी राजकीय पाठबळ गरजेचे असते. यापूर्वीच्या अनेक साहित्य संमेलनाचे आयोजन राजकीय व्यक्तींनी केले होते. त्यामुळे संयोजकीय पातळीवरून हा मुद्दा आता निकालात निघाला आहे. संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून राजकीय नेतेमंडळींना निमंत्रण देण्यावरूनही खूपवेळा वादंग माजले होते. उदगीर संमेलनाचे उद्घाटन ज्ये÷ नेते शरद पवार आणि समारोप राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होत आहे. देशभरात ज्या पद्धतीचे राजकीय वातावरण तापलेले आहे, ते पाहता सौहार्द, स्नेह आणि परस्परविश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. माणूस जोडण्याचे काम साहित्य करत असते. बालाघाटातील उदयगिरी डोंगररांगांच्या साक्षीने अशी जोडणी झाली तर साहित्य संमेलनाचे ते मोठे फलित म्हणावे लागेल. उद्घाटन समारंभास ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात गोमंतकीय साहित्यिक दामोदर मावजो यांची उपस्थिती आहे. कोकणी भाषेचा अभिमान असणाऱया मावजो यांनी जात-धर्मापलीकडे माणूसपणाचाच पुरस्कार आपल्या साहित्यातून केला आहे. लेखनातून आणि आपल्या आचरणातूनही परखड विचारांचे दर्शन त्यांनी घडवले आहे. वेळप्रसंगी आंदोलनात सहभागी होऊन आपली कृतीशीलता त्यांनी दाखवून दिली आहे. संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे हे प्रतिभावान कथा आणि कादंबरीकार आहेत. जीवनातील गूढ आणि तरीही रम्य असलेल्या रहस्यांचा अखंड शोध आपल्या साहित्यातून ते घेत असतात. त्यांच्या कथेतील पात्रे स्वप्नांचा उलगडा करतात, नातेसंबंधांचा पीळ दाखवतात, प्रेमासह विविध भावभावनांचे प्रकटीकरण करतात. माणूसकीचा अविरत शोध घेणाऱया भारत सासणे यांनी मराठी साहित्याची उंची वाढवली आहे. उंचावरील खगोल आपल्या कथा-कादंबऱयांमधून वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणारे मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या उदगीरमध्ये हे संमेलन होत असताना सीमावादावर चर्चा होणे अपेक्षित होतेच. एकीकडे भाषिक ऐक्मय साधून सौहार्द निर्माण करण्याची चर्चा होते, दुसरीकडे भाषिक राज्यांच्या सीमांबाबत वाद होतो. जीवन असीम आहे. माणूसपण चिरंतन आहे. भाषावैविध्य असले तरी भावनिक ऐक्मय महत्त्वाचे आहे. कोणत्याही भाषेतील साहित्याचा मूलकंद माणूस जोडणारा असतो. दुर्दैवाने राजकीय अभिनिवेशामध्ये भाषिक सौख्य सापडल्याचे चित्र आहे. मराठी आणि कन्नड बोलणारी माणसे संवादी आहेत, पण सत्ताकांक्षी राजकीय व्यवस्था कहारी, स्वार्थी आहे. भाषेचा दुस्वास करणे हा अधमपणा झाला. अकराव्या शतकात निर्माण झालेल्या वचन साहित्यातून परमेश्वराची आळवणी करताना इहलोकातील मानवी वास्तव्य सौख्यकारी व्हावे, अशीच कामना केली आहे. सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वरांनी आपल्या सुमारे 60 हजार वचनांमधून शक्ती-भक्तीबरोबरच ज्ञानसंपन्न होण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. साहित्य संमेलनात या विषयावर चर्चा होत आहे ही समाधानाची गोष्ट आहे. शेतकरी आणि पर्यावरणावरही संमेलनात जोरकस विचार मांडले जाणार आहेत. ज्या मराठवाडय़ात हे संमेलन होत आहे, तिथे शेकडो शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेती करणे अत्यंत अवघड झाले आहे. मराठी साहित्यातून शेतकऱयांचे जे चित्रण केले गेले आहे ते कितपत सत्य आहे, याची शहानिशा संमेलनात केली जाणार आहे. त्याचप्रमाणे साहित्यातील निसर्ग म्हणजे पर्यावरण नव्हे, पर्यावरणाची सखोल चिकित्सा करणारे लेखन मराठीत झाले आहे का, याची सांगोपांग चर्चा केली जाणार आहे. बा. भ. बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली, ना. धों. महानोर अशा कवी-साहित्यिकांनी केलेले निसर्गवर्णन म्हणजे समग्र पर्यावरण नव्हे हे खरे आहे. एकूणच उदगीरचे संमेलन रसिकांसाठी बौद्धिक मेजवानी ठरेल असे वाटते. डॉ. ना. य. डोळे यांनी उदगीरमध्ये केलेल्या साहित्यसेवेची बूज राखण्यात आली आहे हेही विशेष आहे. तथापि, साहित्य संमेलनांची गरज आताच्या काळात आहे का, नव्या पिढीतील लेखकांची कुवत, आवाका आणि समज वाढवण्यासाठी संमेलन कितपत उपयुक्त ठरेल, असे प्रश्न विचारले जातात. नव्या लेखकांनी राजकीय पक्षांच्या दावणीला बांधून न घेता साहित्याच्या नभांगणात मुक्त विहार करायला शिकले पाहिजे. पाश्चात्यांचे अनुकरण न करता स्वतःची वाट शोधली पाहिजे. त्यासाठी अभ्यास तर केला पाहिजेच, पण आत्मिक उन्नयन करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रसिक वाचकांसाठी मात्र हा सृजनसोहळा आयुष्यभराचा ठेवा असतो.
Previous Articleआरसीबीची दुसऱ्या स्थानी गरुडझेप!
Next Article महामार्गावर अपघाताची मालिका
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.