पाणीटंचाईमुळे घ्यावा लागतोय टँकरचा आधार : नागरिकांना आर्थिक फटका
बेळगाव : शहरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. राकसकोप जलाशयाने तळ गाठला असून हिडकल जलाशयातून येणाऱ्या जलवाहिन्यांना ठिकठिकाणी लागलेल्या गळत्यांमुळे आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे खासगी टँकरद्वारे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एक तर वर्षभराची पाणीपट्टी भरायचीच आणि त्याचसोबत खासगी टँकरसाठी पैसेही खर्च करण्याची वेळ नागरिकांवर आल्याने संतापाची लाट उसळली आहे. बेळगाव शहराला राकसकोप व हिडकल या दोन जलाशयातून पाणीपुरवठा होतो. राकसकोप जलाशय परिसरात म्हणावा तसा पाऊस मागील पंधरा दिवसात न झाल्याने पाण्याची कमतरता जाणवत आहे. यामुळे धरणातील पाण्याने तळ गाठला असून पाणीपातळी डेडस्टोअरेजच्या मर्यादेपर्यंत पोहोचली आहे. यामुळे बेळगाव शहराला होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. त्यातच हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा होणाऱ्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्याने त्यामधूनही पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे. हिडकल व राकसकोप जलाशयातून येणारे पाणी तुम्मरगुद्दी व हिंडलगा येथील पंपिंग स्टेशनमधून शहरापर्यंत आणले जाते. राकसकोपमध्ये पाण्याची क्षमता कमी असल्यामुळे त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे.
पाण्याच्या टँकरमध्ये दरवाढ
एरवी 300 ते 400 रुपये असणारा पाण्याचा टँकर आता मात्र 500 ते 700 रुपयांवर पोहोचला आहे. पाणीपुरवठा मंडळाकडून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे.
जलाशयातून दिवसा केवळ 30 एमएलडी पाणीपुरवठा : – रुद्रेश घाळी (मनपा आयुक्त)
राकसकोप जलाशयातून दररोज 55 एमएलडी पाणी शहराला पुरविले जात होते. परंतु, जून महिन्याच्या पहिला आठवडा आल्याने जलाशयाने तळ गाठला आहे. यामुळे केवळ दिवसा 30 एमएलडी पाण्याचा पुरवठा जलाशयातून होत आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.
रस्ता धुण्यासाठी पाण्याचा वापर
पाणीपुरवठा मंडळाने नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. परंतु, यातील बऱ्याचशा टाक्यांच्या नळांना गळती लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. शिवाय पाण्याची टाकी रिकामी असल्यास नागरिक बटण दाबून पंप सुरू करतात, मात्र टाकी भरल्यानंतर पाणी वाहून जात असले तरी पंप बंद करत नाहीत. तर काही गल्ल्यातून या टाक्यातील पाण्याचा वापर घरासमोरील रस्ता धुवून काढण्यासाठी केला जात आहे. अशा बेजबाबदार नागरिकांवर खात्याने कारवाई करणे गरजेचे आहे.