अनियमित बससेवेत विद्यार्थ्यांची फरफट : बससेवा सुरळीत करण्याची मागणी
बेळगाव : शहर आणि ग्रामीण भागातील बसपासधारक विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बसफेऱ्यांची कमतरता असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बसफेऱ्या नियमित सोडाव्यात, अशी मागणी होत आहे. बससेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थ्यांची फरफट सुरू आहे. सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत धोकादायक प्रवास होऊ लागला आहे. विशेषत: ग्रामीण भागातून दररोज हजारो विद्यार्थी शहरात दाखल होतात. हे विद्यार्थी परिवहनला बसपाससाठी वर्षाकाठी ठराविक रक्कम देतात. मात्र या विद्यार्थ्यांसाठी सुरळीत बससेवा नसल्याने प्रवास त्रासदायक बनला आहे. तर काही विद्यार्थी बसपास असूनदेखील खासगी वाहनांवर अवलंबून आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसानही सोसावे लागत आहे. वर्षासाठी एकदाच पैसे भरूनदेखील बस उपलब्ध होत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. सकाळ व सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. दरम्यान बसमध्ये चढण्यासाठी चढाओढ सुरू होते. त्यामुळे अपघाताची शक्मयताही असते. प्रवाशी आणि विद्यार्थ्यांची बसमध्ये जागा मिळविण्यासाठी धडपड सुरू असते. दरम्यान घरी वेळेत पोहोचण्यासाठी काही विद्यार्थी दरवाजात लेंबकळत प्रवास करतात. शहरातील सर्वच बसथांब्यांवर ही परिस्थिती पाहायला मिळते. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्यासारखाच आहे. त्यामुळे सर्व मार्गांवर बसफेऱ्या वाढवून सुरळीत बससेवा पुरवावी, अशी मागणी आहे.