प्रतिनिधी/ मुंबई
महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला घालवून खोकेबाज सरकारने महाराष्ट्राला धोका दिला आहे. वेदांत आणि फॉक्सकॉनच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाविषयी तीन वर्षांपूर्वी चर्चा झाली होती. दीड वर्षांपासून चर्चेच्या फेऱया सुरु होत्या. वेदांत हा प्रकल्प मुंबईत येणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प गुजरातला घालवून शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राशी प्रतारणा केली असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार हे निश्चित असताना गुजरातला गेलाच कसा, ‘स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके’ असे हे सरकार असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आल्याची माहिती वेदांता ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी ट्विट करुन दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारला टीकेचे लक्ष्य केले. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनीही या मुद्यावरुन शिंदे सरकावर टीकेची झोड उठवली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षी दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये या प्रकल्पाविषयी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमेवत आपण स्वतः वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी हा उद्योग महाराष्ट्रात आणण्याचे कबुल केले होते. फॉक्सकॉनच्या अध्यक्षांशीही देसाई यांनी चर्चा करुन तळेगावची जागा निश्चित केली होती. तथापि कागदपत्रे होण्याआधी सरकार बदलले आणि आता हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. प्रकल्प कुठे गेला याचे दुःख नाही मात्र ही कंपनी महाराष्ट्र सोडून शेवटच्या क्षणी दुसरीकडे गेली हा प्रश्न आणि तेच दुःख असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
70 हजार रोजगार निर्मितीची क्षमता
आदित्य ठाकरे म्हणाले, पावणे दोन लाख कोटींच्या या प्रकल्पातून त्याच्याशी संबंधित 160 इंडस्ट्री राज्यात आल्या असत्या. 70 हजारहून अधिक रोजगार निर्मिती झाली असती. मग शेवटच्या टप्प्यात नेमके काय झाले की गुजरातच्या उद्योगमंत्र्यांनी ती तिकडे नेली. राज्यातील यंत्रणेने त्यासाठी काहीच प्रयत्न का केले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री कार्यालयाने जुलैमध्ये ट्विट करुन हा प्रकल्प राज्यात येणार असे जाहीर केले होते. मग एका महिन्यात काय घडले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राचा घास गुजरातने हिसकावला
शिंदे-फडणवीस यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राचा घास गुजरातने हिसकावून घेतल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तेथील निवडणुका तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजप गुजरातचे हित जपण्यात व्यस्त असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार गमावल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यातील तरुणांची माफी मागतील काय? असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्रातील तरुणांनी दहिहंडय़ाच फोडायच्या का ?
महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास 90 टक्के चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. या प्रकल्पातून 1 लाख रोजगार निर्माण होणार होते. एवढा मोठा प्रकल्प
गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंडय़ाच फोडत बसायचे काय? असा सवाल काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केला
आहे.
गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही? उदय सामंत यांचा प्रतिप्रश्न
फॉसकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, असे आव्हान शिंदे सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. तसेच आता तरी त्यापेक्षा दुपटीहून अधिक गुंतवणूक असलेल्या रिफायनरीच्या गुंतवणुकीत खोडा घालू नये, असे म्हटले आहे. प्रकल्प गुजरातला गेल्याचे आम्हालाही दुःख आहे. पण, खचलो नाही. आम्ही सेमिकंटक्टर क्षेत्रातील अन्य कंपन्यांशी चर्चा करू आणि त्यांना महाराष्ट्रात आणू. गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक चांगल्या उंचीवर महाराष्ट्राला निश्चितपणे नेऊ. ठाकरे किंवा जयंत पाटलांनी वेदांताची गुंतवणूक गेल्याबद्दल गळे काढताना नाणार रिफायनरीच्या माध्यमातून होणाऱया 3.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत तरी खोडा करू नका, असेही सामंत म्हणाले.