जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सीमाभागात संताप
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी भाषिक असलेला संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्यानंतर त्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्यांना 17 जानेवारी रोजी अभिवादन करण्यात येते. या कार्यक्रमाला सीमासमन्वयक मंत्री आणि सीमातज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने उपस्थित राहणार होते. यासाठी त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण येण्यासंबंधीची माहिती दिली. मात्र त्यांच्यावर पुन्हा एकदा बेळगाव जिल्हा बंदीचा आदेश काढला. याबाबत पोलिसांना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशदेखील दिले होते. त्यामुळे ते हजर राहू शकले नाहीत. या प्रकारामुळे सीमाभागातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्रातील काही नेतेमंडळी बेळगावात दाखल होतात. मात्र त्यांच्या येण्यावर बंदी घालण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वीही महाराष्ट्रातील नेते बेळगावात येवू नयेत यासाठी बंदीचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येण्यावर बंदी घातली. याबाबत सोमवारीच जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश बजावले आहेत.
हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमालाही महाराष्ट्रातील नेत्यांच्या येण्यावर बंदी घातली जाते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा आता याविरोधात महाराष्ट्रानेच आवाज उठविण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.