कुस्तीपटूंकडून सरकारला आणखी 5 दिवसांचा कालावधी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना अटक करावी, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी त्यांची पदके गंगार्पण करण्याचा निर्णय सध्यापुरता मागे घेतला आहे. शेतकरी नेते राकेश तिकैत यांच्या सांगण्यावरुन त्यांनी हा निर्णय मागे घेतला. केंद्र सरकारला त्यांनी कारवाई करण्यासाठी आणखी पाच दिवसांचा कालावधी दिला असून त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.
आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना रविवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही काळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, त्यांनी त्यांच्या मागण्या सोडलेल्या नाहीत. तसेच केंद्र सरकारने ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई केली नाही, तर आपली सर्व पदके गंगार्पण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यासाठी ते उत्तराखंडमधील हरिद्वार येथे पोहचलेही होते. तथापि, शेतकरी नेते राकेश तिकैत यांनी त्यांची तात्पुरती समजूत काढली आणि त्यांना पदके विसर्जित करण्यापासून परावृत्त केले. त्यांचे म्हणणे कुस्तीपटूंनी मानल्याचे सांगण्यात आले.
गंगासभेचा विरोध
कुस्तीपटूंनी त्यांची पदके गंगार्पण करण्यास गंगासभा या संघटनेने विरोध केला आहे. गंगामातेच्या पवित्र क्षेत्राला कुस्तीपटूंनी राजकारणाचा आखाडा बनवू नये, असे आवाहन या संघटनेचे अध्यक्ष नितीन गौतम यांनी केले. गंगेत अस्थी अर्पण केल्या जातात. पदके या खेळाच्या अस्थी नाहीत. कोणताही खेळ अजरामर असतो. गंगामातेची पूजा करण्यासाठी ते येथे आले तर त्यांचे स्वागत आहे. मात्र, त्यांनी पदके विसर्जित करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही यथाशक्ती रोखण्याचा प्रयत्न करु, असाही निर्धार नितीन गौतम यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचेही आवाहन
खेळाडूंनी त्यांची पदके गंगार्पण करु नयेत, असे आवाहन काँग्रेसकडूनही करण्यात आले होते. सरकारशी संघर्ष करण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. त्यांचा अवलंब करावा असे आवाहन हरिद्वार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सत्पाल ब्रम्हचारी यांनी केले होते. त्यावर खेळाडूंनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
आमरण उपोषणाचा इशारा
पदके गंगार्पण करण्यासमवेतच खेळाडूंनी आमरण उपोषण करण्याचाच्ही इशारा दिला होता. यासाठी त्यांनी इंडिया गेट या स्थानाची निवड केली होती. गंगा नदीत पदके अर्पण केल्यानंतर सर्व आंदोलक कुस्तीपटू आमरण उपोषणाला प्रारंभ करणार होते. मात्र, आता त्यांची योजना पाच दिवसांसाठी पुढे गेली आहे.
जंतर-मंतर केले रिकामे
कुस्तीपटूंचे आंदोलन गेले अनेक दिवस दिल्लीतील जंतर-मंतर येथे चाललेले होते. तथापि, गेल्या रविवारी पोलिसांनी सर्व आंदोलक आणि त्यांचे समर्थक यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचे सामानसुमानही तेथून हलविण्यात आले आणि जंतर-मंतरचे स्थान रिकामे करुन घेण्यात आले आहे. आता कुस्तीपटूंच्या पुढच्या योजनेसंबंधी सर्व संबंधितांमध्ये चर्चा केली जात आहे. जंतर-मंतरवर पुन्हा येण्यास या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी अनुमती नाकारली आहे.
उलटसुलट प्रतिक्रिया
कुस्तापटूंच्या आंदोलनासंबंधी राजधानी दिल्ली आणि इतरत्र उलटसुलट चर्चा केली जात आहे. केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी काहींची प्रतिक्रिया आहे. तर खेळाडू आंदोलन ताणत असून त्यामुळे खेळाची हानी होत आहे, असे काहीजणांचे मत आहे. खेळाडू मात्र त्यांच्या मागण्यांवर ठाम असून सिंग यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय ते मागे घेण्याच्या तयारीत नाहीत.