पुणे / प्रतिनिधी :
राजकारणात येणाऱ्या व्यक्तीने नगरसेवक, आमदार, खासदार होण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणे चुकीचे नाही. कसब्यातून निवडणूक लढविण्यास अनेक इच्छुक असले, तरी प्रदेश स्तरावरील समिती नाव निश्चित करेल आणि दिल्लीतूनच उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी जाहीर केले. दरम्यान, टिळक कुटुंबीयांपैकी उमेदवार आल्यास निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे घरातील उमेदवार देणार नाही, असे कुणीही म्हटलेले नाही. मात्र निर्णय दिल्लीतच होईल, असे सांगत पाटील यांनी उमेदवाराच्या नावाची गुप्तता कायम ठेवली.
कसबा विधानसभेचा उमेदवार ठरविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही उमेदवारी दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की बिनविरोध निवडणूक होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमची घोषणा गल्लीत नाही, तर दिल्लीतून होते. पण, प्रयत्न सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीतील महान नेत्यांनी निवडणूक होणार, असे सूचित केल्याचे सांगत अजित पवार यांना त्यांनी टोला लगावला.
यापूर्वी भाजपने बिनविरोध निवडणुका होऊ दिल्या नाहीत. त्यामुळे आता ती अपेक्षा तुम्ही करू नये, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यावर ते म्हणाले, आम्ही घरातील उमेदवार देणार नाही, असे कोणी सांगितले? आमच्या पक्षात प्रदेश आणि त्यानंतर दिल्लीत निर्णय घेतले जातात. आमची पार्टी लोकशाही मार्गाने चालते. त्यामुळे त्यानुसारच पावले पडतील.