ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा द्यावा अशी आमची अजिबात इच्छा नाही. आम्हाला गद्दार म्हणायचा एकाही शिवसैनिकांना अधिकार नाही. खोटं बोलून शिवसैनिकांना भडकवू नका. शिवसेनेच्या हिताची भूमिका घेऊन आम्ही बाहेर पडलो आहोत. आमची भूमिका मान्य करा आम्ही परत येतो. जे आमदार तुमच्या संपर्कात असतील तर त्यांना बोलून घ्या, त्यांची नावे सांगा. आमच्या संयमाचा बांध तुटला आहे. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्या आम्ही यायला तयार आहोत असे आवाहन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकारांनी (Deepak Kesarkar) शिवसेनेला केले आहे. भाजप-सेना युतीच्या निर्णयासाठी शेवटचा दिवस आहे असा इशाराही शिंदे गटाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आमदारांना डांबून ठेवल्याचा आरोप खोटा आहे. सेना आमदारांना संपवण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे. आम्ही आमचं सर्वस्व सोडून पक्षांसाठी काम केलं. आणि आम्हाला तुम्ही गद्दार, मेलेले प्रेत, डुक्कर असे शब्द वापरता हे मी सहन करणार नाही. सेनेसाठी पूर्वीपासून काम केलेले आहे. त्यामुळे आम्हाला कोण गद्दार म्हणत आहेत त्यांना जाब विचारण्याचा मला नैतिक अधिकार आहे. अविश्वास प्रस्तावासाठी आता राज्यपालांनी पाऊल उचलावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी युतीसंदर्भात चर्चा करा आणि आम्हाला निर्णय द्या. उगाच आम्हाला का गद्दार बोलताय. शिंदे गटातील आमदारांना शिवसेनेपासून बाजूला व्हायचं नाही. तुम्ही राष्ट्रवादी, काँग्रेस सोबतची आघाडी तोडा आम्ही परत येतो. बंडखोर आमदार तत्त्वाने एकत्र आले आहेत. तुम्ही जे आकडे सांगत आहात त्यांची नावे घेऊन दाखवा. माझी शेवटची कळकळीची विनंती आहे तुम्ही शेवट गोड करा करा पक्षाच्या हिताचा निर्णय घ्या अशी विनंतीही केली आहे.