बेळगाव : उगार खुर्द ते विजयनगर यादरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम केले जात असल्याने तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस बेळगावपर्यंतच धावत आहे. त्यामुळे कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वेस्थानकातून कोल्हापूरपर्यंत थेट बससेवा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे प्रवाशांचा अतिरिक्त खर्च वाचला असून थेट प्रवास करणे सोयीचे ठरले. तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस 28 मे ते 5 जूनपर्यंत बेळगावपर्यंतच धावणार आहे. त्यामुळे मिरज, सांगली, कोल्हापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता होती. रेल्वेस्थानकात उतरलेल्या प्रवाशांना रिक्षा अथवा खासगी वाहतुकीने मध्यवर्ती बसस्थानक गाठून तेथून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास करावा लागणार होता. यामध्ये प्रवाशांना आर्थिक फटकाही बसणार होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून थेट बससेवेची मागणी केली. 5 जूनपर्यंत बेळगाव रेल्वेस्थानकातून कोल्हापूरसाठी बससेवा उपलब्ध असणार आहे. सोमवारी पाच बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कोल्हापूरला जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे ही बससेवा अपुरी पडली. त्यामुळे सात ते आठ बस उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. एक्स्प्रेस रेल्वेस्थानकात दाखल होताच येथून पुढे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची घोषणा स्थानकात केली जात होती. त्यामुळे रेल्वेस्थानकातून बाहेर पडल्याबरोबर लगेचच बसमधून प्रवास करणे सोयीचे झाले.
वादावादीचे प्रकार
तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनाला जाण्यासाठी तीन ते चार महिन्यांपूर्वी रेल्वेचे बुकिंग केले जाते. बुकिंग करून सर्व दौरा नियोजित असताना अचानक मार्गात बदल करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होते आहे. आम्ही तिरुपती ते कोल्हापूर प्रवासाचे पूर्ण पैसे भरले असल्याने कोल्हापूरपयर्तिं मोफत बससेवा उपलब्ध करून द्या, अशी मागणी काही प्रवाशांनी केली. त्यामुळे बसमध्ये बसल्यावर कंडक्टरसोबत काहीजणांनी हुज्जतही घातली. यामुळे वादावादीचे प्रकार वाढले आहेत.