ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जाता पंढरीसी । सुख वाटे जीवा । आनंद केशवा । भेटताची ।।
टाळ-मृदंगाचा अखंड गजर…पांडुरंगाच्या भेटीची आस…सर्वत्र भरून राहिलेला भक्तीचा दरवळ…अन् लाखो वारकऱ्यांची मांदियाळी….अशा वातावरणात व पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी इंद्रायणी काठी एकवटलेले. इंद्रायणीला जणू महापूरच आलेला. विठ्ठलभक्तीच्या या शीतल वर्षावात आज अक्षरशः न्हाऊन निघाली. पहाटेपासून विधिवत पूजा, आरती नंतर या सोहळय़ाची सुरुवात झाली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, हर्षंवर्धन पाटील, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, यांच्या उपस्थितीत पूजा संपन्न झाली. त्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास तुकोबांच्या पालखीने प्रस्थान ठेवले.
पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाडय़ात असेल. उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची आरती होईल. ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतील त्यानंतर तुकोबांची पालखी पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.