काँग्रेस नेत्याकडून अमेरिकेत भाजप सरकार लक्ष्य
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित केले आहे. हा कार्यक्रम न्यूयॉर्कच्या जेविट्स सेंटरमध्ये झाला आणि यावेळी सुमारे 5 हजार अनिवासी भारतीय उपस्थित होते. राहुल यांच्या भाषणापूर्वी या कार्यक्रमात ओडिशातील रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राहुल यांनी स्वत:च्या भाषणात पंतप्रधान मोदींमुळे देशाचा विकास रखडल्याचा आरोप केला आहे.
तुम्ही सर्वजण कारमध्ये बसून या कार्यक्रमस्थळी पोहोचला आहोत. परंतु जर तुम्ही केवळ रियर ह्यू मिररमध्ये पाहून गाडी चालवाल तर ते योग्य ठरेल का? एका मागोमाग एक दुर्घटना घडतील. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची गाडी अशाच प्रकारे चालवत आहेत. ते मागे वळून पाहत आहेत आणि मग दुर्घटनांवर दुर्घटना का घडत असल्याने हैराण होत असल्याची टीका राहुल यांनी केली आहे.
संघ अन् भाजप कालबाह्या विचारसरणी बाळगून आहे. त्यांना काहीही विचारले तर ते भूतकाळाकडे बोट दाखवू लागतात. रेल्वे दुर्घटना का घडली असे विचारले तर भाजप नेते काँग्रेस सरकारने 50 वर्षांमध्ये काय केले असा प्रतिप्रश्न करतात. भाजप सरकारने अभ्यासक्रमातून पीरियॉडिक टेबल का हटविले असे विचारले गेल्यास काँग्रेसने 60 वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाची आठवण करून देत असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.
आय लव्ह यू
माझे तुम्हा सर्व लोकांवर अत्यंत प्रेम आहे. ‘आय लव्ह यू’ असे राहुल यांनी उपस्थित भारतीयांना संबोधित करताना म्हटले आहे. कुठल्याही कार्यक्रमात भाजपच्या नेत्याला इतरांना आय लव्ह यू म्हणताना कधी ऐकले आहे का? काँग्रेसच्या बैठकांमध्ये हा प्रकार सर्वसामान्य आहे. याचमुळे आम्ही द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान सुरू करण्यासाठी आलो आहे असे मी म्हणतो असे वक्तव्य राहुल यांनी केले आहे. अमेरिकेत भारतीयांना मिळविलेले यश पाहून मला गर्व वाटतो. सर्व अनिवासी भारतीयांनी येथे बरेच काही मिळविले असल्याचे राहुल म्हणाले.
महात्मा गांधी अन् गोडसे
देशात दोन विचारसरणींदरम्यान लढाई सुरू आहे. यात एकीकडे महात्मा गांधी तर दुसरीकडे नथुराम गोडसे आहेत, महात्मा गांधी हे आधुनिक विचारांचे होते. तर गोडसे केवळ भूतकाळ उगाळत होता. भाजप गोडसेच्या विचारसरणीला मानणारा आहे. आम्ही महात्मा गांधी यांची सत्य आणि अहिंसेच्या विचारसरणीचे पाईक आहोत असा दावा राहुल यांनी केला आहे.
स्वत:च्या चुकांचे खापर इतरांवर
भाजप आणि पंतप्रधान मोदी हे स्वत:च्या चुकांचे खापर इतरांवर फोडतात. काँग्रेस सरकारच्या काळात दुर्घटना घडल्यावर आम्ही कधीच इंग्रजांमुळे ही दुर्घटना घडल्याचे म्हटले नाही. काँग्रेसच्या रेल्वेमंत्र्याने दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस कधीच हिंसक किंवा संतप्त होत नाही, हेच आमचे सामर्थ्य आहे. आम्ही कधीच पंतप्रधान मोदींवरून आरडाओरड केली नाही. आम्ही आमचे वर्तन बदलले नाही कारण आम्ही द्वेषाला द्वेषाने संपवू शकत नाही. त्यांचे काम द्वेष पसरविण्याचे तर आमचे प्रेम पसरविण्याचे आहे. हेच द्वेषाच्या बाजारातील प्रेमाचे दुकान असल्याचे उद्गार राहुल यांनी काढले आहेत.
तुमची मन की बात ऐकू इच्छितोय
अमेरिकेच्या पुढील दौऱ्यात मी शिकागो, अटलांटा यासारख्या अन्य ठिकाणच्या भारतीयांना भेटू इच्छितो. येथील सर्व भारतीयांसोबत आत्मियतापूर्ण संबंध निर्माण करू इच्छितो. मी येथे येऊन माझी मन की बात करू इच्छित नाही, तर तुमच्या मनातील म्हणणे ऐकू इच्छितो असे वक्तव्य राहुल यांनी केले आहे.